दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे स्टार कॅम्पेनर्स उतरवून देखील भाजपला दिल्लीत दखलपात्र कामगिरी करता आलेली नाही. आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दिल्लीत प्रचारसभा घेतली होती. मात्र, त्यांच्या प्रचाराने देखील दिल्लीकरांचं समाधान न झाल्यामुळे अखेर दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आम आदमी पक्षाच्या झोळीतच मत टाकलं आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे आम आदमी पक्षाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे विरोधकांनी मात्र या संधीचा फायदा घेत भाजपवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.
‘विभाजनाला दिल्लीनं नाकारलं’
दिल्ली विधानसभा निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. एएनआयला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये अखिलेश यादव म्हणाले, ‘या विजयाबद्दल मी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन करतो. त्यासोबतच मी दिल्लीच्या जनतेचे देखील आभार मानतो. दिल्लीच्या जनतेनं द्वेष, फसवणूक आणि विभाजनाच्या राजकारणाला नाकारलं आहे. दिल्लीतल्या या निकालांनंतर आता भाजपला कोणताही ‘बाग’ आठवणार नाही’.
Samajwadi Party chief Akhilesh Yadav on AAP leading in #DelhiElection2020: I congratulate Arvind Kejriwal ji. I also thank the people of Delhi who rejected the politics of hate, betrayal, and destruction. After the result of this election, BJP will not remember any Bagh. pic.twitter.com/BUO9sMvchq
— ANI (@ANI) February 11, 2020
एकूण ७० जागांच्या दिल्ली विधानसभेमध्ये गेली पाच वर्ष आम आदमी पक्षाचे ६७ आमदार आणि भाजपचे ३ आमदार असं चित्र होतं. यंदाही तसेच काहीसे निकाल दिल्लीत लागले असून भाजपच्या ३ जागांमध्ये ४ ते ५ जागांची भर पडण्याची शक्यता आहे. मात्र, असं असलं, तरी दिग्गज प्रचारकांच्या उपस्थितीनंतर देखील भाजपच्या वाट्यात वाढलेल्या जागा अपेक्षेपेक्षा कमीच असल्यामुळे भाजपसाठी हा मोठा फटका मानला जात आहे.