पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला. याबाबतची घोषणा काल १४ एप्रिल रोजी केली. पंतप्रधानांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन सुरु करणार असल्याची खोटं वृत्त प्रसारित करण्यात आलं. तसंच एक पत्र देखील व्हायरल झालं. त्यानंतर वांद्रे स्थानकाच्या बाहेर तोबा गर्दी झाली. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेनंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेने परिपत्रक काढून आणि ट्विट करुन कुठलिही विशेष रेल्वे चालवण्यात येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे, रेल्वेकडून अडकलेल्या मजूरांसाठी विशेष ट्रेन चालवण्यात येणार असल्याचं वृत्त निव्वळ अफवा आहे. ३ मे पर्यंत रेल्वे बंद असणार आहे. त्यामुळे १५ एप्रिल ते ३ मे दरम्यान देशभरात ज्या लोकांनी रेल्वेचं तिकिट बुक केलं आहे, त्यांचं बुकिंग आता रद्द केलं जाणार आहे.
It is clarified that all Passenger train services are fully cancelled, across the nation, till 3rd May 2020 and there is no plan to run any special train to clear the passenger rush
All concerned may pl.take note of the same and help us in resisting any wrong news in this regard
— Ministry of Railways (@RailMinIndia) April 14, 2020
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने यापूर्वी देश २१ दिवस लॉकडाऊन केला होता. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आलं. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. दरम्यान, १४ एप्रिलला लॉकडाऊन संपेल या आशेने लोकांनी १४ एप्रिलनंतर तिकिटांचं बुकिंग केलं होतं. तब्बल ३९ लाख रेल्वे तिकीट बुकींग करण्यात आले होते पण लॉकडाऊन वाढवल्यामुळे रेल्वेने मंगळवारी ३ मे पर्यंत सर्व प्रकारच्या प्रवासी सेवाच रद्द केल्या. तसंच या काळात केलेलं बुकिंगही रद्द केलं आहे.
हेही वाचा – हेच ते पत्र आणि हीच ती बातमी; म्हणून वांद्र्यात जमा झाले हजारो मजूर!
मुंबईतील वांद्रा स्टेशनजवळ परप्रांतीय मजुरांचा आक्रोश पाहायला मिळाला. जवळजवळ १५०० मजूर वांद्रे पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाबाहेर जमा झाले होते. सोमवारी ४ च्या हे सर्व मजूर आपल्या मूळगावी जाण्यासाठी स्थानकाजवळ जमले होते. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानं त्यांचा राग अनावर झाला, असं पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलं. दरम्यान, एका वृत्तवाहिनीच्या बातमीमुळे हे मजूर गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे जमले होते, अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे.
दरम्यान, ज्यांनी रेल्वेचं तिकीट बुक केलं आहे त्यांना तिकिटाची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. तिकिटाची रक्कम प्रवाशांच्या खात्यावर परत येणार आहे. यासह काउंटरद्वारे बुकिंग करणार्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत मिळणार आहे. ज्यांनी काऊंटरवरुन तिकीट काढलं आहे अशांनी ३१ जुलैपर्यंत परतावा घेऊ शकतात असं रेल्वेनं म्हटलं आहे.