रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाने अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात अंतरीम जामीन मंजूर केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करणारे उपहासात्मक ट्विट केले होते. त्यानंतर Attorney जनरल यांच्याकडे पुण्यातील काही वकिलांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर Attorney जनरल के. के. वेणूगोपाल यांनी कुणाल कामरावर अवमान खटला (Contempt of Court) दाखल करण्यास परवानगी दिली आहे. मात्र त्यानंतरही कुणाल कामरा याने न घाबरता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टावर टीका केली आहे. आदीच्या ट्विटमध्ये कुणालने सुप्रीम कोर्टातील महात्मा गांधी यांचा फोटो काढून तिथे हरिश साळवे यांचा फोटो लावावा अशी मागणी केली होती. आता जवाहरलाल नेहरू यांच्याजागी महेश जेठमलानी यांचा फोटो लावण्याची मागणी त्याने केली आहे.
No lawyers, No apology, No fine, No waste of space 🙏🙏🙏 pic.twitter.com/B1U7dkVB1W
— Kunal Kamra (@kunalkamra88) November 13, 2020
अर्णब गोस्वामीसोबत पंगा घेण्याची कुणाल कामराची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील त्याने इंडिगो विमान प्रवासात गोस्वामीला प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. त्याबद्दल त्याच्यावर विमान प्रवास करण्याची बंदी टाकण्यात आली होती. भाजप आणि भाजप समर्थकांवर सतत टीका करताना कुणाल कामरा दिसलेला आहे. मात्र आता अर्णबच्या निमित्ताने सुप्रीम कोर्टावर केलेली टीका त्याला भोवण्याची शक्यता आहे.
कुणालने अर्णबला अंतरिम जामीन देणारे न्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर टीका केली होती. न्या. चंद्रचूड हे विमानातील कर्मचाऱ्यांप्रमाणे वागत असून ते प्रथम दर्जाच्या प्रवाशांना शॅम्पेन देत आहेत. तर दुसरीकडे सामान्य लोकांना विमानातही बसून दिले जात नाही, असे ट्विट कुणालने केले होते. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये त्याने म्हटले, आता वकिलांनी सुप्रीम कोर्ट आणि न्यायाधीशांना सन्मानीय म्हणणे सोडून दिले पाहीजे. या सर्व ट्विटमुळे कुणाल कामरावर अवमान याचिका दाखल करण्यात आली. ज्यावर पुन्हा कुणालने सडेतोड टीका केली आहे.