परदेशात जाण्याचा विचार करतायं! मग जरा थांबा. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी पुन्हा वाढवली आहे. यामुळे भारतातून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंतही कोणत्याही आंतरराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होऊ शकणार नाही. म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत कोणतेही आंतरराष्ट्रीय विमान भारतातून परदेशात जाणार नाही किंवा अन्य कोणत्याही देशातून आंतरराष्ट्रीय विमान भारतात येणार नाही. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (Directorate General of Civil Aviation) आज यासंदर्भात एक परिपत्रक जाहीर केले आहे.
DGCA ने यासाठी वाढवली बंदी
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेचा वाढता धोका आणि अनेक देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे डीजीसीएने ही बंदी वाढवण्याचा निर्णय घेतला. अमेरिका आणि काही युरोपियन देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटच्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अनेक देशांनी इतर देशांमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ही बंदी आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणे आणि डीजीसीएने परवानगी दिलेल्या विमानांना लागू होणार नाही. तसेच काही निवडक मार्गांवरील आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
— DGCA (@DGCAIndia) July 30, 2021
एअर बबल सिस्टम राहणार सुरु
‘वंदे भारत’ अभियानांतर्गत गेल्या वर्षी मे महिन्यापासून विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाण सुरू होते. भारताने काही देशांसोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ व्यवस्था देखील केली. अमेरिका, यूके, युएई, केनिया, भूतान आणि फ्रान्स या देशांसह २७ देशांशी भारताने एअर बबल करार केले आहे.या एअर बबल कराराअंतर्गत, दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांची विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे दोन्ही देशांमध्ये करू शकतात. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकामुळे अनेक देशांनी हा करार थांबवला होता.