देशात कोरोना विषाणूने अक्षरश: कहर केला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे उद्योग व्यवसायाला याचा मोठा फटका बसला आहे. लहान व्यवसायापासून ते मोठ्या उद्योगांना कामगार आणि पगार कपात करावी लागत आहे. तर अनेक मजूर हाती काम नसल्यामुळे आपल्या गावी परतले आहेत. अशातच कोरोना संकटात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. देशात नव्याने ४७ हजार १५० लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
४७ हजार लोकांना रोजगाराची संधी
तामिळनाडू सरकारने बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने १७ कंपन्यांसोबत १५ हजार १०० कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास ४७ हजार १५० लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. दरम्यान, राज्य सरकारने वाहन आणि ऊर्जा क्षेत्रासह विविध क्षेत्रांत करार केले आहेत. यातील ९ करार सचिवालयात मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तर अन्य ८ करार कंपन्यांनी व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून केले आहेत. सरकारने दिलेल्या माहितीनुसार; फिनलँड येथील सालकॉम्प १ हजार ३०० कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. यामुळे १० हजार लोकांना रोजगार मिळेल.
सालकॉम्प कंपनीने गेल्या वर्षी झालेल्या ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याच्या कराराव स्वाक्षरी केली होती. चेन्नई पॉवर जनरेशन लिमिडेटने नैसर्गिक वीज निर्मितीसाठी ३ हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे.
हेही वाचा – गृहमंत्र्यांनी घेतला नाशिक जिल्ह्याचा आढावा