देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने देशाची चिंता अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आजपासून १४ एप्रिलपर्यंत ‘टीका उत्सव’ म्हणजे कोरोना लस उत्सव या मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नागरिकांना कोरोनाची लस मिळावी, तसेच प्रत्येक नागरिकापर्यंत कोरोनाची लस पोहोचावी हा यामागचा मुख्य हेतू आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यात अनेक नेते मंडळी नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीबद्दल जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. तर ‘लस उत्सव’ या मोहिमेअंतर्गत उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या अनेक राज्यांतील नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन करण्यात येत आहे.
देशात कोरोनाचा कहर वेगाने सुरू असून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी देखील तितक्याच ताकदीने प्रयत्न सुरू आहे. शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात गेल्या ८५ दिवसात १० कोटी कोरोना लस नागरिकांना देण्यात आल्यात. जगात सर्वाधिक वेगात लसीकरण मोहीम राबिवणारा भारत हा देश पहिलाच देश ठरला आहे. तर अमेरिकेला १० कोटी कोरोना लस नागरिकांना देण्यास ८९ दिवस आणि चीनला १० कोटी कोरोना लस देण्यासाठी १०२ दिवसांचा कालावधी लागला होता.
We're going to begin 'Tika Utsav' today nationwide. I urge countrymen to abide by 4 things – assist those who need help getting inoculated, help people in COVID treatment, wear masks & motivate others & if someone tests positive, create micro-containment zone in the area: PM Modi pic.twitter.com/CYDazDGuDG
— ANI (@ANI) April 11, 2021
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यासह कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरण मोहीमेचा आढावा गुरूवारी घेतला. या आढावा बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी वयवर्ष ४५ पेक्षा जास्त असणाऱ्या सर्व नागरिकांना कोरोना लस देण्यास लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन देखील केले. यावेळी त्यांनी लस कशा प्रकारे वाया जाणार नाही, याकडे लक्ष देण्यास सांगितले तर लस उत्सव या मोहीमेदरम्यान, चार दिवसांत लस वाया गेली नाही तर आपली लसीकरण क्षमता वाढलेली असेल असेही त्यांनी सांगितले.