हैदराबादः तेलंगणा स्वतंत्र झाल्यानंतर तेथील कारभार यशस्वीपणे चालवणारी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) आता राष्ट्रीय राजकारणात उतरणार आहे. देशव्यापी संघटना बांधण्याची सुरुवात महाराष्ट्रातून होणार आहे. विशेष म्हणजे नांदेडमधून पक्ष बांधणीला सुरुवात होणार आहे, अशी माहिती तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दिली.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, नांदेड येथे राष्ट्रीय पक्ष बांधणीचे विशेष माॅडेल राबविले जाईल. तेलंगणाच्या विकासासाठी खास माॅडेल तयार करण्यात आले होते. त्याचे देशभर कौतुक झाले. त्यानुसार राष्ट्रीय राजकारणासाठीही विशेष प्लान तयार करण्यात आला आहे. या प्लानमार्फत बीआरएसचे काम देशभरातील सहा लाख गावांमध्ये पोहोचवले जाईल. मला दोन वर्षे द्या, मी उज्ज्वल भारत देईन, असा दावाही मुख्यमंत्री राव यांनी केला.
तेलंगणातील पक्षाची धोरणे, प्रकल्प आणि योजना याची माहिती महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही ठेवणार आहोत. नांदेडसोबतच महाराष्ट्रातील अन्य भागांनाही भेटी दिल्या जातील. अलिकडेच महाराष्ट्राच्या सीमाभागातील काही गावांतील लोक मला भेटले. बीआरएसचा ध्वज वापरण्याची आणि सीमा भागातील लोकांच्या कल्याणासाठी लढण्याची परवानगी त्यांनी मागितली आहे, असे मुख्यमंत्री राव यांना सांगितले.
बीआरएसचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र स्थानी ठेवून प्लान तयार करण्यात आला आहे. बीआरएसची शेतकरी शाखा भारत राष्ट्र किसान समितीच्या शाखा सहा लाख गावांमध्ये उघण्यात येणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणा, ओडिशा, पंजाब, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून या शाखांचा विस्तार सुरु होईल. त्यानंतर मध्य प्रदेश व नंतर टप्या टप्याने या शाखांचे देशभरात जाळे पसरवले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री राव यांनी दिली.
देशाचा विकास करण्यासाठी नदी जोड प्रकल्प सर्वात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यासाठी राॅकेट सायन्सची गरज नाही. लास वेगासाठी अमेरिकेने ६०० किमी अंतरावरुन पाणी आणले. उत्तर चीनसाठी तर १,६०० किमी अंतरावरुन तेथील सरकारने पाणी नेले. आपल्याकडे गंगा, महानदी, कावेरी, गोदावरी व अन्य अनेक नद्या आहेत. या नद्या एकमेकांना जोडल्या तर कोणालाच पाण्याची कमतरता भासणार नाही, असे मतही मुख्यमंत्री राव यांनी व्यक्त केले.
शेतकरी आत्महत्या महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. महाराष्ट्रातील हे चित्र नक्कीच आम्ही बदलू व देशभरात आमचा पक्ष पोहोचवू, असेही मुख्यमंत्री राव यांना सांगितले.