मोबाईल युझर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मोबाईल कंपन्या आता तुमची कॉल हिस्ट्री दोन वर्षांसाठी सुरक्षित ठेवतील. कारण केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) सुरक्षेच्या कारणास्तव ग्राहकांच्या कॉल डेटा आणि इंटरनेट वापराशी संबंधित रेकॉर्ड ठेवण्याचा कालावधी एक वर्षावरून दोन वर्षांपर्यंत वाढवला आहे.
“परवानाधारकाने सर्व व्यावसायिक रेकॉर्ड / कॉल डिटेल्स रेकॉर्ड / एक्सचेंज डिटेल्स रेकॉर्ड / IP डिटेल्स रेकॉर्ड तसेच नेटवर्कवरील संवादाचे रेकॉर्ड जतन करावे,” असे DoT परिपत्रकात म्हटले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अशा नोंदी किमान दोन वर्षे सुरक्षित ठेवाव्यात, असे त्यामध्ये म्हटले आहे.
ही दुरुस्ती सार्वजनिक हितासाठी किंवा देशाच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे परिपत्रकात म्हटले होते. २१ डिसेंबर रोजी परवान्यातील सुधारणा जारी करण्यात आल्या आणि २२ डिसेंबर रोजी इतर प्रकारच्या दूरसंचार परवानग्यांमध्ये वाढ करण्यात आली.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले की विविध सुरक्षा एजन्सींना एका वर्षानंतरचा डेटा आवश्यक असतो. खरे तर अशी अनेक प्रकरणे आहेत, ज्यांचा तपास पूर्ण व्हायला बराच वेळ लागतो. अशा स्थितीत या भागात सेवा देणाऱ्या कंपन्यांसोबत अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यात दोन वर्षे डेटा ठेवण्याबाबत चर्चा झाली आणि त्यांनीही त्याला होकार दिला.
दूरसंचार आणि इंटरनेट सेवा कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकारांना सांगितले की, सरकार कंपन्यांना हे तपशील किमान १२ महिन्यांसाठी ठेवण्यास सांगतात, परंतु प्रत्यक्षात ते १८ महिन्यांसाठी ठेवण्याचा नियम आहे. दरम्यान, टेलिकॉम कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा ते असा डेटा हटवतात किंवा नष्ट करतात, तेव्हा ते डेटा ऑफिसला त्याची माहिती देतात.
तथापि, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की त्यांच्याकडे विनंती आल्यास, ते काही काळासाठी ठेवतात. पण काही वेळाने डेटा डिलीट होतो. दुरुस्ती अंतर्गत, दूरसंचार कंपन्यांना इंटरनेट सेवा, ई-मेल, इंटरनेट टेलिफोनी सेवांचे लॉगिन आणि लॉगआउट तपशीलांसह ग्राहकांचे इंटरनेट डेटा रेकॉर्ड ठेवणे बंधनकारक आहे. यापूर्वी कॉल डेटा आणि इंटरनेट वापराचे रेकॉर्ड किमान एक वर्षासाठी जतन करण्याचा नियम होता.