मुंबई : कॅनडातील खलिस्तानची आग लंडनपर्यंत पोहोचली. सध्या स्कॉटलंडच्या दौऱ्यावर असलेले ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना ग्लासगो शहरामध्ये खलिस्तान समर्थकांनी गुरुद्वारात प्रवेश करण्यापासून रोखले. दोराईस्वामी यांच्यासमोर ‘खलिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. निदर्शने करणाऱ्या तेथील फुटीरतावाद्यांचा आकडा कदाचित कमी असेल, पण या विझवलेल्या आगीवर फुंकर मारण्याचा प्रयत्न कोणीतरी करीत आहे व त्याचा संबंध 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीशी आहे, अशी शंका आता रुजू लागली आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – गुन्हेगारांचा राजकारणात प्रवेश रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने उचलले महत्त्वाचे पाऊल, वाचा…
लंडन किंवा कॅनडाच नाही, पश्चिमी देशांतील अनेक भागांत खलिस्तान समर्थक सक्रिय झाले आहेत. त्यांची सक्रियता हिंसक आणि आव्हानात्मक आहे. भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांना गुरुद्वारात जाण्यापासून रोखण्यात आले. त्याच वेळी लंडनमध्ये हरमनसिंह कपूर या शीख हॉटेल उद्योजकावर अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या. कपूर यांच्या गाडीवर गोळीबार करणारे खलिस्तान समर्थक आहेत. खलिस्तान समर्थक ब्रिटनमधील राष्ट्रवादी भारतप्रेमी शिखांना धमक्या देत आहेत व तेथील पोलीस ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
कॅनडा, इंग्लंडमधील भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयांवर बॉम्ब फेकणे, तिरंगा जाळणे, उच्चायुक्तांची गाडी अडवणे, मंदिरांवर हल्ले करणे ही बाब सामान्य नाही असे परराष्ट्रमंत्री जयशंकर सांगतात ते खरेच आहे, पण ही सामान्य बाब 2024 च्या निवडणुकांपर्यंत अशीच चालू देणार का? हाच खरा प्रश्न असल्याचे ठाकरे गटाने म्हटले आहे.
हेही वाचा – सरासरी 80 वर्षांच्या आयुष्यात आपण सर्वाधिक वेळ कुठे घालवतो? धक्कादायक आकडेवारी आली समोर
आज जी पिढी खलिस्तानची मागणी करीत आहे, त्यांनी भारताच्या भूमीवर पाय ठेवलेला नाही, पण त्यांना वेगळा देश हवा आहे. हा त्यांचा वेगळा देश इंग्लंड आणि कॅनडाच्या भूमीवर मागणे अधिक सयुक्तिक ठरेल. ज्या पंजाबमध्ये महाराजा रणजितसिंगांनी एकेकाळी इंग्रजांशी लढून भारताचे स्वातंत्र्य राखले, त्याच इंग्रज भूमीवर भारताला तोडण्याचे कारस्थान स्वतःला महाराजा रणजितसिंग यांचे अनुयायी म्हणवून घेणारे काही मूठभर लोक करीत आहेत, असे या अग्रलेखात अधोरेखित करण्यात आले आहे.
इंग्लंडच्या ढिलाईमुळेच तेथे खलिस्तानी चळवळीस मुक्त वाव मिळाला आहे. इंग्लंडमध्ये शीख मोठ्या प्रमाणावर आहेत व त्यांच्याकडे ‘व्होट बँक’ म्हणून पाहिले जाते. कॅनडातील खलिस्तान समर्थकांना ब्रिटनमधून बळ मिळत आहे, हे स्पष्ट होत आहे. इंग्लंडच्या भूमीवर असलेल्या शिखांच्या प्रार्थनास्थळांत भारतीय राजदूतांना जाता येत नाही, त्यांची गाडी अडवली जाते. ही इंग्लंडमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेची स्थिती आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.