मुंबई : लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर काही दिवसातच ईडीने घोटाळ्याचा ठपका ठेवत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्याहीपूर्वी निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच करवसुलीसंदर्भात आक्षेप घेत काँग्रेसची खाती गोठवण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन आता इंडी आघाडीसह विरोधक आक्रमक झाले असून रविवारी रामलीला मैदानात अनेक पक्षांमधील बड्या नेत्यांनी एकत्र येत केंद्र सरकारविरोधात आवाज उठवला. या रॅलीच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे गटाने आपले मुखपत्र ‘सामना’तून केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे.
सीएसआर फंडातही गोंधळ
“भाजपने देशात सर्वच स्तरांवर आर्थिक अफरातफर केली आहे. त्याच अफरातफरीच्या पैशांवर त्यांचे राजकारण सुरू आहे. सीएसआर फंडातही भाजपने हात मारला आहे आणि हा आकडा 1 कोटी 14 लाख 470 इतका आहे. मनमोहन सरकारने 2013 मध्ये एक कायदा केला. प्रत्येक कंपनीला 2 टक्के लाभाचा पैसा सीएसआर म्हणजे जनकल्याणाच्या कार्यात द्यावा लागेल. हा पैसा लोकांसाठी वापरायचा होता, पण भाजपने हा पैसा त्यांच्या खासगी संस्था, स्वतःची प्रसिद्धी व इतर बनावट कार्यात वापरला. त्यांच्या मर्जीतल्या विश्वस्त संस्था, एनजीओच्या खात्यात हा पैसा वळवून दुसऱ्या मार्गाने त्याच कंपन्यांच्या मालकांना लाभ मिळवून दिले. यातील पैसा परदेशातही गेला. आंगडियांचा वापर करून ‘मनी लाँडरिंग’ झाले. पण येथे ना ‘ईडी’ घुसली ना तुमचे इन्कम टॅक्सवाले,” असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
हेही वाचा – Thackeray Group : हा तर राजकीय कर दहशतवाद; उद्धव गटाचा हल्लाबोल
500 च्या 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा कुठे गेल्या?
“नोटाबंदीच्या काळात रिझर्व्ह बँकेतून 500 च्या 88 हजार कोटी रुपयांच्या नोटा गायब झाल्या. नव्याने छापलेल्या त्या नोटा रिझर्व्ह बँकेत पोहोचल्याच नाहीत. हे पैसे मध्येच गायब झाले. या पैशांना कोठे पाय फुटले? जर हे सर्व खरे असेल तर त्याबाबत काय कारवाई झाली? हे पैसे कुणाच्या खात्यात गेले की घशात गेले? याच पैशांवर उद्याच्या लोकसभा निवडणुका लढवल्या जाणार आहेत. यावर काहीच खुलासा झालेला नाही. हे भारतीय जनता पक्षाचे पाप आहे,” अशा शब्दांमध्ये मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
अर्थव्यवस्थेवर संघाचा प्रभाव
‘‘देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे, पण भाजपच्या डॉक्टरांना चिंता नाही,’’ असा टोला आता पी. चिदंबरम यांनी मारला आहे. अर्थव्यवस्था समजू शकेल अशी व्यक्ती भाजपमध्ये नाही. वारेमाप उधळपट्टी आणि ईडीच्या मार्गाने लूटमार करणे एवढेच त्यांचे अर्थज्ञान आहे. भाजपमध्ये ‘डॉक्टर’ या संकल्पनेस मान्यता नाही. कोरोनासारख्या महामारीत औषधांपेक्षा टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना पळवा, असे सांगणारे पंतप्रधान आपल्या देशाला लाभले. त्यांच्याकडून आजारी अर्थव्यवस्थेवर काय इलाज होणार? भाजपमध्ये डॉक्टर नसून मनोरुग्ण आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्था पंगू बनली. अर्थव्यवस्थेवर संघाचा प्रभाव आहे. म्हणजे भाजपने सुरू केलेल्या लुटमारीस संघाची मान्यता आहे. त्यांचे अर्थशास्त्र हे रामदेव बाबा पॅटर्नचे आहे. आजही ते शेण, गोमूत्र अशा अर्थतंत्रात अडकून देश चालवीत आहेत. त्यामुळे देशाची आर्थिक नीती तसेच गती खड्ड्यात गेली आहे. देशाच्या थेट परकीय गुंतवणुकीत 31 टक्क्यांनी घसरण झाल्याची टीका उद्धव गटाने केली आहे.
हेही वाचा – PM Modi : केंद्रीय तपास यंत्रणा पूर्णपणे स्वतंत्र, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर पलटवार
अर्थमंत्री सीतारामनही जबाबदार
“अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे निवडणूक लढवायला पैसे नाहीत, पण त्यांच्या अर्थखात्यातील घोटाळे आणि दहशतवादामुळे भाजपच्या खात्यात 8 हजार कोटींचा माल गैरमार्गाने पोहोचला त्याचे काय? या घोटाळ्यास अर्थमंत्री सीतारामनही तितक्याच जबाबदार आहेत. इन्कम टॅक्स खाते सीतारामन सांभाळतात. त्या खात्याने काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, तृणमूलला करवसुलीच्या नोटिसा पाठवल्या, पण वाममार्गाने 8 हजार कोटी मिळवणाऱ्या भाजप कार्यालयाचा पत्ता सीतारामन बाईंना माहीत नाही. मोदींप्रमाणे सीतारामनही खोटे बोलू लागल्या आहेत. लोकशाहीचा गळा घोटण्यात त्यांचे अर्थखाते आघाडीवर आहे. पण बाईसाहेब सतीसावित्रीचा आव आणून आपण स्वच्छ वगैरे असल्याचे दाखवू पाहत आहेत. भाजपमध्ये ‘नमो’ रुग्ण होतेच. आता त्यांची अवस्था मनोरुग्णांप्रमाणे झालेली दिसते. लोकसभा निवडणूक धड होऊ द्यायची नाही, विरोधकांची आर्थिक नाकेबंदी करून त्यांचे हातपाय बांधून मैदानात ढकलायचे आणि स्वतः मात्र पैशांच्या राशीवर बसून चौफेर उधळायचे हे त्यांचे विकृत धोरण आहे. भाजपच्या काळात ‘इमानदारी’ तसेच ‘सचोटी’ हे शब्द हद्दपार झाले आहेत. केंद्रातील सरकार उद्या नक्कीच बदलेल. त्या वेळी विरोधकांविरुद्ध आर्थिक दहशतवाद करणाऱ्या या अर्थ-भामट्यांना अद्दल घडवावीच लागेल,” असा इशाराही अग्रलेखात देण्यात आलेला आहे.