(Thackeray vs Yogi Adityanath) मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमत्री योगी आदित्यनाथ यांनी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला खोटे पाडले. या ट्रिब्युनलला न्यायालयाचा दर्जा आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला अहवाल बकवास ठरवून योगी यांनी गंगेतील पाण्यास स्वच्छतेचे प्रमाणपत्र दिले. पाण्यात मलमूत्र वगैरे नाही तसेच ऑक्सिजनही पूर्ण आहे, असे योगी यांनी जाहीर केले ते कशाच्या आधारावर? असा प्रश्न करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. (Thackeray aggressive over polluted water of river Ganga)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री तसेच उद्योगपती अंबानी, अदानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यांच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी गंगेत डुबकी मारून पुण्य मिळवले. अनेकांनी पाण्याचे आचमन केले. आता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलला स्पष्ट केले की, ज्या गंगेत राष्ट्रपती-पंतप्रधान मोदी, अदानी यांनी स्नान केले, त्यातले पाणी ‘जल-मल संक्रमित’ आहे. म्हणजे गटारातला ‘मैला’ तसेच इतर सर्व घाण, बॅक्टेरिया त्या पाण्यात आढळले, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.
हेही वाचा – Sanjay Raut : शरद पवार आमचे विरोधक नाहीत, शत्रू तर अजिबात नाही; संजय राऊतांकडून स्तुतीसुमने
यावरून उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणतात – साधारण 50 कोटी लोकांनी या ‘जल-मल संक्रमित’ प्रवाहात डुबकी मारून पुण्य प्राप्त केले. त्यावरून वाद निर्माण झाला आहे. प्रयागराज संगमावरचे पाणी स्नानास असुरक्षित आहे. त्यात फक्त मलमूत्रच नाही, तर ऑक्सिजनचीही कमतरता आहे. पाण्यात फेकल कॉलिफॉर्म बॅक्टेरियादेखील आढळले ही चिंतेची बाब आहे, पण केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा अहवाल स्वीकारण्यास मुख्यमंत्री योगी यांनी नकार दिला. विधानसभेत त्यांनी आदळआपट केली. उलट योगी यांनी जाहीर केले की, हा अहवाल खोटा आहे. प्रयाग संगमावरील पाणी हे स्नान करण्यायोग्य तर आहेच, पण पिण्यासारखेदेखील आहे. हे पाणी खुशाल पिऊ शकता.’’
यावर अनेक पर्यावरणवादी लोकांनी आव्हान दिले, “योगीजी, तुमचे म्हणणे एकदम मान्य. चला, आता दूध का दूध पानी का पानी होऊ द्या. योगीजी, तुम्ही तुमच्या संपूर्ण कॅबिनेटसह प्रयागराज संगमावर यावे आणि जनतेसमोर प्रत्येकाने संगमातील लोटाभर पाण्याचे तीर्थ म्हणून आचमन करावे. जगाला दाखवून द्या, गंगा स्वच्छ आहे. आहे तयारी?’’ पण योगी आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे आव्हान स्वीकारायला तयार नाही. महादेवाने समुद्र मंथनातून प्राप्त झालेले विष प्राशन केले, पण योगी गंगेतील लोटाभर पाणी प्यायला तयार नाहीत, असे ठाकरे यांनी सुनावले आहे.
हेही वाचा – Ladki Bahin : 9 लाख महिला अपात्र अन् फेब्रुवारीचा हप्ता वेळेच्या आधीच, वाचा सविस्तर