देशातील कांद्याचे वाढते दर पाहता केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर त्वरीत बंदी घालण्यात आली आहे. देशात कांद्याचे दर वाढले असून देशांतर्गत बाजारात कांद्याची कमतरता आहे. ही कमतरता हंगामी आहे. परंतू कोरोना विषाणूच्या संकटात गेल्या काही महिन्यात कांदा मोठ्या प्रमाणात निर्यात केला गेला. एप्रिल ते जून या कालावधीत भारताने १९.८ कोटी डॉलर कांद्याची निर्यात केली. गतवर्षी ४४ कोटी डॉलरपर्यंत कांद्याची निर्यात झाली होती. कांद्याची सर्वाधिक निर्यात भारतातून बांगलादेश, मलेशिया, युएई आणि श्रीलंका येथे केली जाते.
Government bans export of onions with immediate effect pic.twitter.com/BuAdFAGSpK
— ANI (@ANI) September 14, 2020
पंधरा दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये किलोने विकला जाणारा कांदा सध्या ४५ ते ५० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. कुजलेले कांदेही २५ रुपये किलो दराने विकले जात आहेत. आशियातील सर्वात मोठा भाजीपाला बाजार असेलल्या दिल्लीच्या आझादपूर मंडईमध्ये कांद्याचा घाऊक दर आज २६ ते ३७ रुपये होता. पावसामुळे पीक सडल्याने कांद्याचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. कर्नाटकात मुसळधार पावसामुळे कांद्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा –
‘आदित्य ठाकरेंचे मुव्ही माफियांसोबतचे संबंध उघड केले हाच माझा गुन्हा’; कंगनाचे नवे ट्विट