आसाममध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आसाममध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरतो आहे. परंतु निवडणुकींच्या सभांमध्ये सामाजिक अंताराचा फज्जा उडाला आहे. कोरोना नियम पायदळी तुडवल्याचे या निवडणुकींच्या प्रचारसभेत दिसले आहे. येत्या काही दिवसांत आसाम विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. परंतु भाजप नेते आणि आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी लोकांना गरज असेल तेव्हा मास्क घालण्यास सांगितले जाईल असे सांगितले आहे. आसाममध्ये मास्क वापरण्याची गरज नाही आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा मास्क वापरण्यास सांगितले जाईल असे वक्तव्य आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केले आहे.
देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव जलदगतीने पसरतो आहे. त्यामुळे सर्व राज्यांत कोरोना नियम आणि सामाजिक अंतराचा पालन करण्याचे आवाहन केले आहे. परंतु आसाममधील आरोग्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याने सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत.
आरोग्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुढे म्हटले आहे की, आसामच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवीत करावे लागणार आहे. लोकांनी मास्क घातल्यास सर्व ब्युटी पार्लर कसे चालतील? ब्युटी पार्लर चालणे आवश्यक आहे. ज्या दिवशी मास्क घालण्याची गरज भासेल त्या दिवसापासून सर्वांनी मास्क घालावा, कोरोना विषाणू राज्यात नाही त्यामुळे लोकांना मास्क घालण्याची गरज नाही असे आरोग्यमंत्री सरमा यांनी म्हटले आहे.
देशात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात पाच राज्यात विधानसभा निवडणूका घेण्यात येत आहेत. या राज्यांत प्रचार आणि सभांमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.