मुंबई : मनी लॉण्ड्रिंग घोटाळ्यातील फरार ललित मोदी लंडनमध्ये कायदेपंडित हरीश साळवे यांच्या मेजवानीत दिसला. याच हरीश साळवे यांना ‘वन नेशन वन इलेक्शन’ समितीत माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरीने स्थान मिळाले. याचा अर्थ असा की, भ्रष्टाचार उखडून काढू, परदेशात पळून गेलेल्या घोटाळेबाजांना फरफटत आणू, सर्व काळा पैसा परदेशांतून भारतात आणू या मोदींच्या फक्त थापाच थापा आहेत, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.
हेही वाचा – चोरांचे सरदार दिल्लीत सरकार चालवत आहेत…, ठाकरे गटाचे भाजपावर जोरदार टीकास्त्र
आज देशाचे चित्र काय आहे? मोदी शहांच्या माणसांबरोबर ‘भगोडा’ आरोपी ललित मोदी आरामात ‘चिअर्स’ करीत आहे. हा एक नवाच ‘सनातन धर्म’ भाजपाने निर्माण केलेला दिसतोय. ‘सगळेच चोर मोदी कसे?’ या एका विधानावर राहुल गांधी यांची खासदारकी मोदी सरकारने रद्द केली, त्यांचे घर काढून घेतले, त्यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्या ‘चोर मंडळा’तील एक मोदी लंडनच्या पार्टीत ‘चिअर्स’ करताना संपूर्ण देशाने पाहिला. त्या मोदीला प्रेमालिंगन देणारे कायदेपंडित भारताच्या ‘एक देश एक निवडणूक’ समितीत बसतील तेव्हा देशाच्या भावना नेमक्या कशा असतील? असा प्रश्न ठाकरे गटाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.
हेही वाचा – ‘भारत’ या शब्दाचा 2100 वर्षांपूर्वीचा पुरावा सापडला; ‘हाथीगुंफा’सह ‘विष्णूपुराणा’तही उल्लेख
राहुल गांधी यांनी ‘सर्व मोदी चोर कसे?’ हे विधान करताच साळवे दुःखी झाले. राहुल गांधी यांचे विधान असंसदीय असल्याचे सांगून साळवे यांनी मोदींची (पंतप्रधान) बाजू घेतली त्यामागचे इंगित आता उघड झाले. पंतप्रधान मोदी यांनी जो नवा अमृतकाल निर्माण केला त्या अमृतकालाचे विष करणारा हा प्रकार असल्याची बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.
मोदी व शहा यांना आता ललित मोदी-साळवे संबंधांवर संसदेत उत्तर द्यावे लागेल व उत्तर देताना भंबेरी उडेल म्हणून सत्ताधारी अमृतकालातले विशेष अधिवेशनही गोंधळ घालून बंद पाडतील. भाजप विरोधकांना खोट्या प्रकरणांत गोवणाऱ्या देशातील तपास यंत्रणा आता काय भूमिका घेणार? की ललित मोदीलाही स्वच्छ चारित्र्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होणार? असे सवालही ठाकरे गटाने केले आहेत.
हेही वाचा – One Nation On Election हा एक फ्रॉड; संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात
‘एक देश एक निवडणूक’ विषयीच्या समितीत हरीश साळवे असण्याविषयी कुणाचा काही आक्षेप असण्याचे कारण नसावे. एकतर साळवे हे मोदी यांचे चाहते आहेत, दुसरे म्हणजे साळवे यांना कायद्याचे ज्ञान व अनुभव प्रचंड आहे आणि मोदी सरकारला ते कायदेशीर गोष्टींत मदत करीत असतात. मोदी अडचणीत आले की, साळवे हे काळा डगला चढवून मोदींची बाजू मांडतात. महाराष्ट्रात भाजपाने जे ‘घटनाबाह्य’ सरकार निर्माण केले व त्यास मोदी-शहांचे आशीर्वाद लाभले. या प्रकरणात साळवे घटनाबाह्य सरकारची बाजू हिरिरीने मांडत आहेत. त्यामुळे अशा कायदेपंडितास ‘एक देश एक निवडणूक’ योजनेच्या समितीवर घेतले त्याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही, पण साळवे यांनी आता मोदी-शहांच्या सरकारला संकटात ढकलले आहे. त्यामुळे मोदींचा अमृतकाल काळवंडला जाऊ शकतो, अशी बोचरी टीका ठाकरे गटाने केली आहे.