घरदेश-विदेश...ही ‘मन की बात’ची यात्रा नव्हे, जनतेच्या चिंतेची यात्रा! जयराम रमेश यांची...

…ही ‘मन की बात’ची यात्रा नव्हे, जनतेच्या चिंतेची यात्रा! जयराम रमेश यांची टीका

Subscribe

नांदेड : भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठी देखील नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत असून त्याला काँग्रेस महत्त्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे जयराम रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आमदार भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

- Advertisement -

भारत जोडो यात्रेसंदर्भात माहिती देताना जयराम रमेश म्हणाले की, देशातील विदारक परिस्थितीची माहिती जनतेला देण्यासाठीच कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत ही पदयात्रा काढली आहे. देशात सध्या असलेली आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण व राजकीय हुकूमशाहीच्या विरोधात ही यात्रा आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची घसरण यासाह सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. राहुल गांधी दररोज शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, छोटे व्यापारी यांच्या समस्या, व्यथा जाणून घेत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 63 दिवस, 6 राज्ये व 27 जिल्ह्यांतून मार्गक्रमण करत या पदयात्रेने अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. लोकांमध्ये राहुल गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर, विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. भारतीय जनता पक्ष व आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात देशभर एकच पक्ष सामना करू शकतो, तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, असे जयराम रमेश म्हणाले.

- Advertisement -

राहुल गांधी यांच्याबरोबर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत देशभरातील 140 भारतयात्री सहभागी आहेत. त्यात महाराष्ट्रातील 9 भारतयात्री आहेत. डॉ. मनोज उपाध्याय, नवी मुंबई; नंदा म्हात्रे, रायगड; आतिषा पैठणकर, नाशिक; रोशनलाल बिट्टू, चंद्रपूर; पिंकी राजपूत, नागपूर; प्रेरणा गौर, चंद्रपूर; श्रवण रपनवाड, नांदेड; महेंद्र बोहरा, नागपूर व वैष्णवी भारद्वाज, नागपूर हे भारतयात्री आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भारतीय जनता पक्ष टीका करत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे, पण त्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही. ‘भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो,’ असे प्रत्युत्तर नाना पटोले यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेच्या भावना समजून घेत आहेत. ही ‘मुव्हमेंट’ आहे ‘इव्हेंट’ नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उद्या, १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नांदेडमध्ये जाहीर सभा आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत. तर, ११ तारखेला शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत, असे अशोक चव्हाण म्हणाले. या पत्रकार परिषदेत भारत जोडो यात्रेच्या मराठी गीताचे अनावरण करण्यात आले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -