नवी दिल्ली : संपूर्ण देशाने 18 नोव्हेंबर रोजी अंतराळ क्षेत्रात एक नवा इतिहास रचताना पाहिला. या दिवशी भारताने खासगी क्षेत्राने डिझाइन आणि निर्मित केलेले ‘विक्रम-एस’ हे पहिले रॉकेट अंतराळात पाठवले. स्वदेशी अंतराळ स्टार्टअपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून, ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाचे मान अभिमानाने उंचावली. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. जी मुले कधीकाळी कागदाचे विमान बनवून उडवायची, त्यांना आता भारतातच विमाने बनविण्याची संधी मिळत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
Sky is not the limit for India's youth. #MannKiBaat pic.twitter.com/kOJFw1v2mL
— PMO India (@PMOIndia) November 27, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’च्या 95व्या भागात भारताने अंतराळ संशोधनातील खासगी क्षेत्रातील सहभागाचा उल्लेख केला. ‘विक्रम-एस’ रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. इतर रॉकेटच्या तुलनेत ते वजनाने हलके आणि स्वस्त आहे. अंतराळ मोहिमांशी संबंधित इतर देशांच्यातुलनेत याचा विकास खर्च खूपच कमी आहे. कमी खर्चात जागतिक दर्जा देणे, ही आता, अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख झाली आहे. या रॉकेटचे काही महत्त्वाचे भाग हे थ्रीडी प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत, असे सांगून पंतप्रधान म्हणाले, ‘विक्रम-एस’च्या लाँच मिशनला दिलेले ‘प्रारंभ’ हे नाव अगदी योग्य आहे. भारतातील खासगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुले झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नेही प्रत्यक्षात उतरत आहेत. रॉकेटची निर्मिती करणारे हे तरुण म्हणतायत – Sky is not the limit.
अंतराळ क्षेत्रातील आपले हे यश भारत आपल्या शेजारील देशांसोबत देखील सामायिक करीत आहे. कालच भारताने एक उपग्रह प्रक्षेपित केला, जो भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. हा उपग्रह खूप उत्तम दर्जाची छायाचित्रे पाठवेल, ज्यामुळे भूतानला त्याच्या नैसर्गिक स्रोतांचे व्यवस्थापन करण्यास मदत होईल. या उपग्रहाचे प्रक्षेपण म्हणजे भारत आणि भूतान यांच्यातील दृढ संबंधांचे प्रतिबिंब आहे, असे मोदी म्हणाले.
ड्रोन क्षेत्रातही भारताची प्रगती
ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ड्रोनच्या माध्यमातून सफरचंदांची वाहतूक करण्यात आली. किन्नौर हा हिमाचल प्रदेशातील दुर्गम जिल्हा असून या हंगामात येथे मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी होते. अशा परिस्थितीत तेथून सफरचंदांची वाहतूक करणेही तितकेच कठीण आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे हिमाचलचे चविष्ट किन्नौरी सफरचंद लोकांपर्यंत लवकर पोहोचतील. यामुळे आपल्या शेतकरी बंधू-भगिनींचा खर्च कमी होईल आणि सफरचंद वेळेवर बाजारात पोहचेल, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.