कोलाकाता : तृणमूल काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत केंद्रीय यंत्रणांच्या अतिरेकाविरोधातील प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या अतिरेकामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील असे आपल्याला वाटत नसल्याचे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले होते. त्याबाबत तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना विचारले असता त्यांनी तर सरळसरळ हात झटकले.
केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग आणि अतिरेक याविरोधातील प्रस्ताव 189 विरुद्ध 69 अशा आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आला. भाजपा नेत्यांचा एक गट आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या निवासस्थानी कितीवेळा छापे पडले किंवा चौकशी झाली, असा सवाल करत केंद्रीय यंत्रणांच्या भूमिकेबद्दल त्यांनी शंका उपस्थित केली होती. तसेच तुम्ही माझ्या हाती ईडी आणि सीबीआय देऊन 24 तासांचा अवधी द्यावा, मग मी दाखवून देईन की कोठून आणि किती रोकड सापडते ते, असे आव्हानच त्यांनी दिले होते.
#WATCH | TMC MP Saugata Roy says, "WB Assembly passed resolution y'day that CBI-ED being misused. CM had said, she thinks that CBI-ED actions aren't being taken under PM's direction but under provocation by other BJP people. Only she could say what is its political significance." pic.twitter.com/Aq7oHfgBgO
— ANI (@ANI) September 20, 2022
भाजपाचे काही स्थानिक तसेच केंद्रीय नेते आपल्या सरकारविरोधात कटकारस्थान करीत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. तसेच, हे सर्व मोदी करणार नाहीत, असे मला वाटत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. पक्षातील या नेत्यांना आवर घालण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांना करतानाच, केंद्र सरकारचा अजेंडा आणि पार्टीचा राजकीय हेतू यांची गल्लत होऊ नये, असेही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
याबाबत तृणमूल काँग्रेसचे खासदार सौगत रॉय यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले, सीबीआय आणि ईडीचा दुरुपयोग केला जात असल्याबद्दल काल विधानसभेत एक प्रस्तावही मंजूर करण्यात आला. सीबीआय व ईडीच्या या कारवाया पंतप्रधानांच्या आदेशावर होत नाहीत. परंतु भाजपाच्या इतर नेत्यांच्या इशाऱ्यावर या कारवाया होत आहेत. यातून राजकीय संदेश काय निघतो, हे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच सांगू शकतील, असे सांगत सौगत रॉय यांनी या चर्चेपासून लांब राहणे पसंत केले.