मध्य प्रदेश पाठोपाठ आता गुजरातमध्येही काँग्रेसला अंतर्गत धक्के बसू लागले आहेत. १९ जून रोजी राज्यसभेच्या २४ जागांसाठी देशभरात निवडणूक होणार आहे. गुजरातमधून चार खासदार निवडले जाणार आहेत. त्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या आमदारांच्या राजीनाम्यामागचे कारण मात्र अस्पष्ट आहे. विधानसभा अध्यक्षांनी सांगितले की, “दोन्ही आमदारांनी स्वच्छेने राजीनामा दिला असून मी दोघांचेही राजीनामे स्वीकारले आहेत.”
Two MLAs Akshay Patel and Jitu Bhai Chaudhary (both from Congress) have resigned voluntarily from the post of MLA and I have accepted it: Rajendra Trivedi, Gujarat Assembly Speaker pic.twitter.com/nKqSeRgafo
— ANI (@ANI) June 4, 2020
कर्जन विधानसभा मतदारसंघातून आमदार अक्षय पटेल आणि वलसाडच्या कपर्डा येथेून जितू चौधरी हे डिसेंबर २०१७ रोजीच्या विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. या दोघांच्या राजीनाम्यानंतर राज्यातील काँग्रेसचे एक मोठे नेते म्हणाले की, “तीन आमदार राजीनामा देतील अशी शक्यता होती. त्यापैकी दोनघांनी दिलेला आहेच. हे आम्हाला अपेक्षित होतेच. भाजप इतर राज्यातही अशीच फोडाफोडी करत आहे, गुजरात तर त्यांचे होम ग्राऊंड आहे.”
गुजरातचे प्रभारी आणि हिंगोलीचे माजी खासदार राजीव सातव यांनी ट्विट करुन भाजपवर टीका केली आहे. “भारत सध्या सर्वात मोठ्या आरोग्य आणीबाणीशी झगडत आहे. अर्थव्यवस्था आणि मानवता अडचणीत सापडली आहे. मात्र भाजप राज्यसभेत अधिक खासदार पाठवण्याखेरीज दुसरा कोणताही विचार करत नाहीये.”
गुजरात की भाजपा सरकार के पास इस आपदा की घड़ी में भी गुजरात की स्वास्थ्य सुविधा बेहतर करने के लिए पैसे नहीं हैं, किन्तु विधायकों की खरीद फरोख्त के लिए पैसे हैं। भाजपा की प्राथमिकता सिर्फ सत्ता है, लोगों के कष्ट दूर करना नहीं।
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) June 4, 2020
मार्च महिन्यातच काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांची संख्या ६८ वर येऊन ठेपली होती. त्यानंतर आता दोन आमदार आणखी गेल्याने काँग्रेसची सदस्यसंख्या ६६ झाली आहे. गुजरात विधानसभेतून राज्यसभेची एक जागा निवडून आणण्यासाठी ३६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे काँग्रेसला आता दुसरा खासदार निवडून आणण्यात अडचण येणार आहे.
तर दुसऱ्या बाजुला भाजपकडे १०३ आमदारांचे संख्याबळ आहे. तसेच त्यांनी तीन जागांसाठी अभय भारद्वाज, रमिला बारा आणि नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपला वरची पाच मते हवी आहेत. बीटीबी पक्षाचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षांच्या पाठिंब्यावर भाजप तिसरी जागा निवडून आणू शकते.