भारतीय संघाने अंडर -१९ विश्व कपमध्ये विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ४५ धावांनी पराभूत केलं आहे. या विजयामध्ये स्पिनर गोलंदाज विक्की ओस्तवालची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्याने १० षटकांमध्ये २८ धावा देत ५ विकेट घेतले आहेत. विक्कीसह यश ढुलनेही चांगली गोलंदाजी करत विजयामध्ये योगदान दिलं आहे. यशने ८२ धावांची खेळी केली आहे. पहिल्या विजयासह भारत २ अंकांनी पुढे असून पहिल्या स्थानी पोहचला आहे.
दक्षिण आफ्रिकेने सामन्यात नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सराव सामन्यात धावसंख्या उभारणारा हरनूर सिंह आणि अंग्रीश रघुवंशी ही जोडी भारताला चांगली सुरुवात करुन देऊ शकली नाही. दोघेही ११ धावांमध्येच तंबूत परतले. यानंतर कप्तान यश ढुल आणि शेख राशीदने भारताचा डाव सांभाळला आणि दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ८७ चेंडूत ७१ धावा काढल्या आहेत. संघाचा स्कोर ८२ झाल्यावर राशीद ३१ धावांवर बाद झाला.
कर्णधार यश ढुलने एक बाजू सांभाळत पहिले निशांत संधू आणि नंतर कौशल तांबेसोबत ४४ आणि ३७ धावांची पार्टनरशिप करत २०० पर्यंत धावा केल्या. यादरम्यान यशने आपले ५० धावांचे अर्धशतक करुन तिसरे अर्धशतक झळकवले. यापूर्वी त्याने सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजविरुद्ध अर्धशतक केले होते. १९५ धावांवर यश बाद झाला. कर्णधार बाद झाल्यावर संघाने ३७ धावा करताना ४ गडी गमावले आणि ४६.५ षटकांमध्ये संघ २३२ धावांवर बाद झाला.
विक्की ओस्तवालने घेतल्या ५ विकेट
दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली राहिली नाही. सुरुवातीला चौथ्या चेंडूवर इथन जॉनचा विकेट राजवर्धनने घेतला. यानंतर डेवाल्ड ब्रेविसने वेलेंटाइन किटाइमसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५८ धावा काढल्या. परंतु विक्की ओस्तवालने वेलेंटाइनला बाद करत जोडी फोडली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला एकापाठोपाठ धक्के बसत राहिले. पूर्ण टीम ४५.४ षटकांमध्ये १८७ धावांवर बाद झाली. भारताने ४५ धावांनी विजय मिळवला आहे. विक्कीने २८ धावा देत ५ विकेट पटकावले आहेत. तर वेगवान गोलंदाज राज बावाने ४ विकेट घेतले.