भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या पैगंबर मोहम्मद यांच्यावरील आक्षेपार्ह विधानाचे समर्थन केल्याने उदयपूर येथील टेलर कन्हैया लाल याची गळा चिरुन हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटत असून आज गुरुवारी उदयपूर येथे या हत्याकांडाच्या निषेधार्त मोर्चा काढण्यात आला. यात हिंदु संघटनांनीही सहभाग घेतला होता. यावेळी हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी भगवे झेंडे फडकवत कन्हैयालाल यासाठी न्यायाची मागणी केली. तसेच तालिबानी राज्य चालणार नाही असे पोस्टर्सही निदर्शकांनी झळकावले. यावेळी जमावावर दगडफेक करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तर काही ठिकाणी दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. विशेष म्हणजे या हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर उदयपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण असे असतानाही हजारोच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे पोलिसांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान कन्हैया लाल याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्याने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली होती. पण पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. यामुळे राजस्थानमध्ये पोलिसांविरोधात वातावरण निर्माण झाले आहे. तर याच मुद्यावरून राजकारण सुरू झाले असून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत जाणीवपूर्वक येथील कट्टर पंथीय संघटनांच्या हालचालींकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. या हत्याकांडामागे दहशतवादी संघटनांचा हात असल्याची शक्यता असल्याने गृहमंत्रालयाने याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवला आहे.