(Union Govt about Delhi stampede) नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्याला जाण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्थानकावरून दोन विशेष रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. त्यामुळे भाविकांची रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती. या गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 18 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्या दिवशी नेमकी किती गर्दी स्थानकांवर झाली होती. किती तिकिटे विकली गेली होती. याची आकडेवारी केंद्र सरकारने लोकसभेत दिली. विशेष म्हणजे, दिल्ली उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर, ट्रेनमधील डब्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त तिकिटे का विकली, असा सवाल न्यायालयाने रेल्वेला केला होता. (More tickets were sold than usual on February 15)
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दररोजच्या सरासरीपेक्षा 13 हजार जास्त जनरल तिकिटे 15 फेब्रुवारी रोजी विकली गेली, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत दिली. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माला रॉय यांना याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याल दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, 15 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून सुमारे 49 हजार जनरल तिकिटे विकण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यांत विकल्या गेलेल्या दैनिक सरासरी तिकिटांच्या तुलनेत ती 13 हजाराने जास्त होती.
कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी, दिल्ली रेल्वे स्थानकावरून पाच कुंभमेळा विशेष गाड्या चालवण्यात आल्या. या प्रत्येक गाड्याची आसनक्षमता 3 हजार प्रवाशांची होती, असे अश्विन वैष्णव यांनी अधोरेखित केले. विशिष्ट स्थानकावरून विशिष्ट तारखेला जारी केलेली अनारक्षित तिकिटे ही त्या स्थानकासाठी आणि तारखेसाठी असू शकतात किंवा नसू शकतात, अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.
तेथील 15 हजार अतिरिक्त प्रवाशांसाठी पाच गाड्या पुरेशा होत्या. रेल्वेस्थानकात झालेल्या गर्दीची चौकशी पूर्ण होईपर्यंत रेल्वेने स्टेशन संचालक आणि वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक तसेच दिल्लीतील मंडल आणि अतिरिक्त मंडल व्यवस्थापकांची बदली केली आहे, अशी माहितीही रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
दिल्ली न्यायालयाने केली होती विचारणा
नवी दिल्ली रेल्वेस्थानकावरील चेंगराचेंगरीबाबत दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तुम्ही डब्यातील प्रवासी संख्या निश्चित केली आहे तर त्यापेक्षा जास्त तिकिटांची विक्री का होते? असा प्रश्न मुख्य न्यायमूर्ती डी.के. उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेडेला यांनी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना केला होता. तसेच, डब्यातील प्रवाशी संख्येइतकीच तिकिटे विकली जावीत, याची खात्री करण्याची दक्षता देखील घेण्यास रेल्वेला सांगितले होते.
हेही वाचा – Dada Bhuse on virar news : उत्तरपत्रिका जळल्या असल्या तरी नो टेन्शन, काय म्हणाले दादा भुसे?