देशात सध्या ५ जी नेटवर्क सेवा सुरु करण्याची तयारी सुरु असून ही सेवा मार्च २०२२ पर्यंत देशात सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र ५ जी पाठोपाठ आता ६ जी सेवेसाठी देखील ग्राहकांना अधिक काळ प्रतिक्षा करावी लागणार नाही. कारण देशात सध्या ६ जी सेवेवर काम सुरु असून २०२३ च्या अखेरपर्यंत किंवा २०२४ च्या सुरुवातीला ही सेवा लाँच होणार आहे. अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी जाहीर केली.
यावर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतात स्वदेशी ६ जी टेक्नोलॉजी सुरु करण्याच्या दिशेने काम सुरु आहे. या टेक्नोलॉजीसाठी वैज्ञानिक आणि इंजिनिअर्स यांना लागणाऱ्या परवानग्या यापूर्वीच दिल्या आहेत. यावरील काम पूर्ण करण्यासाठी सरकारकडून वर्ष २०२३ आणि २०२४ हा काळ निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे २०२४ पर्यंत भारतात ही ६ जी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे.
अश्विनी वैष्णव यांनी पुढे सांगितले की, सरकारकडून स्वदेशी ६ जी टेक्नोलॉजीवर काम सुरु आहे. ही नेटवर्क सेवा चालवण्यासाठी लागणारे टेलिकॉम सॉफ्टवेअर आणि भारतात तयार झालेली अन्य टेलिकॉम उपकरणे यावर लक्ष दिले जात आहे. यामुळे जगभरात जाऊ शकणारे टेलिकॉम नेटवर्क आपल्याकडे असेल .
६ जीशिवाय भारतात विकसित ५ जी सेवाही लवकरचं सुरु होईल. या टेक्नॉलॉजीसाठी लागणाऱ्या प्रमुख सॉफ्टवेअरचे डेव्हलपमेंट पुढील वर्षाच्या तिसऱ्या महिन्यापर्य़ंत पूर्ण होऊ शकते. यामुळे ५ जी स्पेक्ट्रमचा लिलाव २०२२२ सालच्या दुसऱ्या तिमाहीपर्यंत होऊ शकतो. असंही वैष्णव यांनी सांगितले.