बंगळुरू : कर्नाटक विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो लावण्यावरून गदारोळ झाला. त्याविरोधात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्यासह अन्य नेत्यांनी विधानसभेबाहेर धरणे आंदोलन केले.
सभागृहाचे कामकाज व्यवस्थित चालू नये, असे सत्ताधारी पक्ष भाजपाला वाटत असल्याने ते स्वतःच त्यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सरकारविरोधात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आम्हाला समोर आणायची होती, म्हणून भाजपाने हा फोटोचा मुद्दा समोर आणून वाद निर्माण केला. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही, असा आरोप कर्नाटक काँग्रेसचे आमदार डी. के. शिवकुमार म्हणाले.
वाल्मिकी, बसवण्णा, कनक दास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि इतर नेत्यांची छायाचित्रेही लावावीत, अशी मागणी काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी सभापतींना पत्र लिहून केली आहे.
Belagavi | VD Savarkar’s portrait unveiled in Karnataka Assembly hall. Congress MLAs have staged a protest with LoP Siddaramaiah writing to Speaker to install portraits of personalities like Valmiki, Basavanna, Kanaka Dasa, BR Ambedkar, Sardar Vallabhbhai Patel and many others. pic.twitter.com/Esgdl8bdgP
— ANI (@ANI) December 19, 2022
विधानसभेच्या अध्यक्षांनी मनमानीपणे केवळ सावरकरांचे चित्र लावले आहे. त्याबद्दल आमचा निषेध असून इतर समाजसुधारकांचे फोटोही विधानसभेच्या सभागृहात लावावेत, अशी मागणी असल्याचे सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. मी कोणाचेही चित्र लावण्याच्या विरोधात नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेसह इतर मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठी राज्य सरकार अशी पावले उचलत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यापूर्वी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी, स्वातंत्र्यवीर सावरकर हे वादग्रस्त व्यक्तिमत्व असल्याचे म्हटले होते. या फोटोच्या अनावरणाच्या संदर्भात मला कोणतेही निमंत्रण देण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. हा भाजपाचा अजेंडा आहे. महात्मा गांधींच्या हत्येत सावरकर देखील सहभागी होते, असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसचा आधीपासूनच सावरकरांना विरोध
वीर सावरकरांवरून वाद निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा काँग्रेसने सावरकरांवर टीका केली आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली असताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होते. याचे तीव्र पडसाद उमटले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, असा आरोप करून राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सावरकरांनी इंग्रजांना लिहिलेले पत्रही दाखविले होते. सर, मी तुमचा नोकर होऊ इच्छितो, असे सावरकरांनी यात म्हटले असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले होते.