पुढील वर्षी २०२२ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला असून उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपच्या गळाला लागला आहे. माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजप आहे. बाकी पक्ष तर व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत, म्हणून मी भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असं जितीन प्रसाद यांनी म्हटलं.
जितीन प्रसाद हे युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्री होते. आज त्यांनी दिल्लीमधील भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर जितीन प्रसाद यांनी रामराम ठोकल्याने काँग्रेससमोर नवा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-२३ गटापैकी जितिन प्रसाद एक आहेत.
जितीन प्रसाद यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला याबद्दल स्पष्ट केलं आहे. काहीपक्ष व्यक्तिकेंद्री आणि प्रादेशिक झाल्याचं म्हणत त्यांनी प्रत्यक्षरित्या काँग्रेसच्या नेतृत्त्वावर निशाणा साधला. “काँग्रेसमध्ये मला हे जाणवलं की आपण राजकारणात आहोत. जर तुम्ही तुमच्या लोकांच्या हितांचं रक्षण करू शकत नाहीत, त्यांची मदत करू शकत नाही, तर तुमचा राजकारणात राहून काय फायदा? मी काँग्रेसमध्ये हे करू शकत नव्हतो. गेल्या ३ दशकांपासून मी काँग्रेससोबत कार्यरत होतो. पण आज विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. गेल्या ८ ते १० वर्षांमध्ये मला हे जाणवलं आहे की जर कुठला पक्ष खऱ्या अर्थाने राष्ट्रीय असेल, तर तो भाजप आहे. बाकी पक्ष तर व्यक्तीकेंद्री आणि प्रादेशिक झाले आहेत. सध्या आपण ज्या परिस्थितीत आव्हानांचा सामना करत आहोत, तर त्यासाठी आज देशासाठी जर कुणी ठामपणे उभे आहेत, तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी,” अशी प्रतिक्रिया जितीन प्रसाद यांनी पक्ष प्रवेशानंतर दिली.