गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या नाट्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता उत्तर प्रदेश भाजपनं ममता बॅनर्जींविषयी टीका करणारे ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये उत्तर प्रदेश भाजपनं ममता बॅनर्जींना ‘हिटलर दीदी’ म्हटलं आहे. हिटलर ज्याप्रकारे हुकूमशाही करायचा, त्याचप्रकारची हुकूमशाही ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये करत आहेत, असे चित्र या व्यंगचित्रातून दाखवण्यात आलं आहे.
काय आहे नेमकं व्यंगचित्रात?
या व्यंगचित्रामध्ये तीन प्रकारचे दृश्य दाखवण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या दृशात ममता बॅनर्जी हिटलरशाही करत असल्याची टीका करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ रॅलीसाठी पश्चिम बंगालमध्ये जाणार होते. परंतु, त्यांच्या हेलिकॉफ्टरच्या लॅंडिंगला पश्चिम बंगाल प्रशासनाने परवानगी नाकारली होती. याच पार्श्वभूमीवर व्यंगचित्राच्या दुसऱ्या दृश्यामध्ये ममता बॅनर्जींवर निशाना साधण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ हेलिकॉप्टरमध्ये आहेत. त्यांचे हेलिकॉप्टर खाली उतरत आहे. पण, त्यांच्या हेलिपॅडला काटे लावण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या हेलिकॉप्टरला खाली लॅंड होता येत नाही. व्यंगचित्राचे तिसरे दृश्य म्हणजे सध्या पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं नाट्य. दोन दिवसांपूर्वी सीबीआयच्या एका पथकाने कोलकाताच्या पोलीस आयुक्ताच्या घरावर छापा मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनाच अटक केली. याच पार्श्वभूमीवर व्यंगचित्राच्या तिसऱ्या दृश्यामध्ये पश्चिम बंगालच्या पोलिसांनी सीबीआय अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबले आहे आणि पोलीसांकडे त्या तुरुंगाची चावी असल्याचे दाखवण्यात आले आहे.
देश आपके ये तौर-तरीके देख रहा है ‘हिटलर दीदी’, निश्चित ही आप और आपके ठगबंधन के साथियों को जनता पूरी तरह नकार देगी। #MamataFreeBengal #CBIvsMamata #MamataBlocksCBI pic.twitter.com/jJjQWndKdv
— BJP Uttar Pradesh (@BJP4UP) February 4, 2019
ममता बॅनर्जींचं आंदोलन सुरुच
शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी सीबीआयचे एक पथक कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरी गेले. तेव्हा पोलिसांनी सीबीआय पथकाला ताब्यात घेतलं. या घटनेची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कळताच त्या स्वत: राजीव कुमार यांच्या घरी गेल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरुनच सीबीआयचे पथक राजीव कुमार यांच्या घरी छापा मारायला आलं, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. त्याचबरोबर त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरु केले आहे. हे आंदोलन ८ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे.
हेही वाचा – ममता बॅनर्जी आणि चिटफंड घोटाळा; जाणून घ्या यांचा संबंध