भारतीय औषध कंपनीने तयार केलेले कफ सिरप पिल्याने उज्बेकिस्तानमध्ये १८ बालकांचा मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण जगात भारताची नाचक्की होत आहे. यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भारतात तयार झालेल्या कफ सिरपचा बालमृत्यूंशी संबंध आहे की नाही याचा तपास उज्बेकीस्तान सरकार करत असून भारताकडून त्यांना सर्वप्रकारचे सहकार्य केले जात असल्याचे बागची यांनी सांगितले आहे.
तसेच संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींविरोधात उज्बेकिस्तानमध्ये न्यायालयीन प्रक्रीया सुरू झाली आहे. त्यासाठी भारताकडून आवश्यक ती कायदेशीर मदत केली जात असून भारताच्या आरोग्य मंत्रालयाने याची गंभीर दखल घेतली आहे. त्याचपार्श्वभूमीवर संबंधित कंपनीच्या नोएडातील प्लांटचीही चौकशी करण्यात येत असल्याचे बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी कफ सिरप प्रकरणामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत असल्याचे त्यांना विचारण्यात आले. यावर बागची यांनी भारतीय औषध कंपन्या संपूर्ण जगात विश्वसनिय कंपन्या ठरल्या आहेत. यापुढेही वेगवेगळ्या औषधांची निर्मिती करण्यासाठीही त्या तेवढ्याच आश्वासक राहतील अशी ग्वाही यावेळी बागची यांनी दिली. तसेच कफ सिरप सारख्या घटना जेव्हा घडतात तेव्हा भारत सरकार त्याची गांभीर्याने दखल घेत असल्याचेही बागची यावेळी म्हणाले.
भारतीय कफ सिरप आणि बालमृत्यू नेमके प्रकरण काय?
उज्बेकिस्तानमध्ये कफ सिरप पिल्याने १८ मुलांचा मृत्यू झाला. हे सर्व बालमृत्यू भारतातील नोएडा येथील मैरियन बायोटेक या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपनीने तयार केलेले कफ सिरप डॉक- १ मॅक्सचे सेवन केल्याने झाल्याचा गंभीर आरोप उज्बेकिस्तान सरकारने केला आहे.
याआधी गाम्बिया येथेही अशीच घटना घडली होती. कफ सिरप पिल्याने गाम्बियामध्ये ६६ मुलांचा मृत्यू झाला होता. याही मुलांचा मृत्यू भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरप पिल्याने झाल्याचा आरोप करण्यात आला होता.
या दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य असल्याने औषध निर्मिती करणाऱ्या भारतीय कंपन्याच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय औषधांच्या आयात आणि निर्यातीवरही होणार असून त्याचे दूरगामी परिणामही भारताबरोबरच या कंपन्यांना भोगावे लागतील असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. यामुळे याप्रकरणाची चौकशी आणि तपासात संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन भारतातर्फे उज्बेकिस्तानला देण्यात आले आहे.