बंगळुरू : जगात भारताची वेगळी ओळख बनली आहे. येत्या 8 ते 10 वर्षांत भारतीय रेल्वेचा कायापालट करण्याचे आमचे ध्येय आहे. आज सुरू झालेली वंदे भारत ट्रेन ही केवळ ट्रेन नसून ती नव्या भारताची नवी ओळख आहे. 21व्या शतकात भारताची ट्रेन कशी असेल, याची ही झलक आहे. भारताची धाव आता अडखळत असणार नाही, याचे प्रतीक म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस आहे. भारताला आता वेगाने धावायचे आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.
गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणूक दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे आले होते. तिथे त्यांनी केएसआर रेल्वे स्थानकावर पाचव्या वंदे भारत एक्स्प्रेस आणि भारत गौरव काशीदर्शन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. भारतात गुंतवणूक करण्यासाठी जगभरात अभूतपूर्व असे विश्वासाचे वातावरण आहे. त्याचा सर्वात जास्त फायदा कर्नाटकला मिळत आहे. गेल्या तीन वर्षांत संपूर्ण जग कोरोनाने त्रस्त असताना कर्नाटकमध्ये सुमारे चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
आज संपूर्ण जगात भारताची ओळख स्टार्ट अप्ससाठी आहे आणि भारताची ही ओळख आणखी सशक्त करण्यात बंगळुरूचा मोठा वाटा आहे. स्टार्ट अप्स हे केवळ एका कंपनी पुरते मर्यादित नाही. देशासमोरील प्रत्येक समस्येचे जे उत्तर आहे, त्यामागील विश्वास म्हणजे स्टार्ट अप्स आहे, असे मोदी यांनी सांगितले.
चेन्नई-म्हैसूर वंदे भारत एक्स्प्रेस ही दक्षिण भारतातील अशाप्रकारची पहिलीच रेल्वेगाडी आहे. ही गाडी चेन्नईचे औद्योगिक केंद्र, बंगळुरूचे तंत्रज्ञान आणि स्टार्टअप केंद्र तसेच प्रसिद्ध पर्यटन शहर असलेले म्हैसूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवेल, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले, आमचे सरकार देशात नवीन विमानतळही बांधत आहे. 2014 पूर्वी देशात सुमारे 70 विमानतळे होती, पण आता त्यांची संख्या 140हून अधिक झाली आहे. विमानतळांची ही वाढती संख्या आपल्या शहरांची व्यावसायिक क्षमता वाढवत आहेत. तरुणांसाठीही नवीन संधी देखील यामुळे निर्माण होत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.