विजय माल्ल्या हे नाव आता तमाम भारतीयासाठी परिचयाचं झालं आहे. देशातल्या लाखो खातेदारांच्या ठेवी असणाऱ्या बँकांना तब्बल ९ हजार कोटीचा चुना लावून पसार झालेल्या माल्ल्याला भारतात आणून त्याच्याकडून वसुली करायला हवी, असं आता प्रत्येकालाच वाटतंय. मात्र, यासाठी त्याच्याविरोधात खटला चालणं आवश्यक आहे आणि त्या खटल्यासाठी कागदपत्र देखील लागतात. मात्र, विजय माल्ल्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रच गायब झाल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. आणि तोही थेट सर्वोच्च न्यायालयात! त्यामुळे कागदपत्रांच्या अभावी या खटल्याची सुनावणी पुढे ढकलावी लागण्याचा प्रकार गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात घडला.
विजय माल्ल्या सध्या लंडनमध्ये आश्रयाला आहे. त्याच्यावर देशातल्या बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याचं भारताकडे प्रत्यार्पण होणं आवश्यक असून लंडन न्यायालयात देखील येनकेन प्रकारे माल्ल्या हे प्रत्यार्पण लांबणीवर टाकण्यात यशस्वी ठरत असताना आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयासमोर माल्ल्याशी संबंधित एका प्रकरणाची कागदपत्र गायब असल्याचं निदर्शनास आलं आहे. २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्याला बँकांचे पैसे बुडवल्याप्रकरणात त्याची संपत्ती वितरीत करण्यावर निर्बंध घातले होते. मात्र, न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात जात माल्ल्याने आपल्या मुलांमध्ये संपत्तीचं वितरण करून टाकलं. त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान असल्याची बाब समोर आली. त्याविरोधात माल्ल्याने दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी ही याचिकेची कागदपत्रच गायब असल्याची बाब समोर आली आहे. न्यायालयाने याचिकेची मागणी नोंदणी अधिकाऱ्यांना केल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
Supreme Court adjourns for August 20 the review plea filed by fugitive liquor baron Vijay Mallya (in file pic), who has sought review of its May 2017 order holding him guilty of contempt of court for transferring money to his children in violation of the court's order. pic.twitter.com/rbsAMwRrKD
— ANI (@ANI) August 6, 2020
दरम्यान, या सगळ्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने माल्ल्या प्रकरणाची सुनावणी २० ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. मात्र, लंडन न्यायालयात अजूनही माल्ल्याच्या प्रत्यार्पणाच्या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. एकूण १७ भारतीय बँकांना माल्ल्याने चुना लावल्याचे आरोप त्याच्यावर आहेत.