रायपूर : संपूर्ण देश आज 75 व्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करीत आहे. पण तुम्हाला माहीत आहे देशातील एक गाव असे आहे, जे स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर पहिल्यांदाच गावात तिरंगा फडकावत आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. छत्तीसगड राज्यातील बस्तर जिल्ह्यातील एक गाव आहे, जे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झेंडावंदन करीत आहे. हे छत्तीसगड आणि ओडिसाच्या सीमेवरील चांदमेटा गाव आहे, जिथे आतापर्यंत नक्षलवाद्यांचे राज्य होते.
एकेकाळी नक्षलवादी येथे त्यांच्या नवीन ‘फायटर’ना प्रशिक्षित करायचे आणि त्याला त्यांची राजधानीही म्हटले जायचे. पण आता सरकार आणि सुरक्षा दल ज्या प्रकारे नक्षलवाद्यांविरोधात सातत्याने मोर्चेबांधणी करत आहेत, त्यामुळे त्यांचे क्षेत्र कुठेतरी कमी होत आहे. म्हणूनच आता हे गाव माओवाद्यांच्या नव्हे तर सैनिकांच्या ताब्यात आहे. अशा स्थितीत आता चांदमेटा डोंगरावरील गावात सुरक्षा दलाच्या नव्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यानंतर हा पहिलाच स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला असून, अशा स्थितीत गावकऱ्यांनीही सैनिकांसोबत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केले आहे.
पहाटेपासूनच गावकरी आपापल्या घरातून बाहेर येत एका ठिकाणी जमले आणि सैनिकांच्या छावणीजवळ पोहोचले. प्रथम त्यांनी जिल्हा दल आणि सीआरपीएफसह कॅम्पच्या आत ध्वज फडकावला. यानंतर त्यांनी आपल्या गावात ध्वजाचे पूजनही केले, बांबूच्या काठीवर तिरंगा बांधला, गावातील एका ज्येष्ठाकडून तो फडकावला. दरम्यान, सुरक्षा दलाच्या जवानांसह ग्रामस्थांनीही हातात तिरंगा घेऊन गावात प्रभातफेरी काढली. हाच तो भाग आहे, जिथे माओवादी एकेकाळी काळे झेंडे फडकवत असत, पण आता बस्तरमध्ये हा बदल स्पष्टपणे दिसत आहे. यामुळेच जिथे एकेकाळी काळे झेंडे बनवले जायचे तिथे आता काळ्या ध्वजाची जागा तिरंग्याने घेतली आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच चांदमेटा गावात तिरंगा अभिमानाने फडकावण्यात आला.