उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानुष हत्येच्या घटनेतील पीडित दलित मुलीचे कुटुंबीय अद्यापही भीतीच्या छायेखाली आहे. इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार, “काहीही घडू शकते, आम्हाला सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे गाव सोडण्याचा विचार आहे,” असे पीडितेच्या भावाने सांगितले आहे.
…ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत
पीडितेच्या भावाने असे म्हटले की, “आम्ही या गावात सुरक्षित नाही. ते आमच्यासोबत काहीही करु शकतात. आमचा पोलिसांवर आणि प्रशासनावर विश्वास नाही. आम्हाला आता अधिकच भीती वाटू लागली आहे. आम्ही आता यापूर्वीपेक्षा त्यांच्या अधिकच रडारवर आहोत. ते आम्हाला जीवंत सोडणार नाहीत. त्यामुळे आम्ही आता गावही सोडू शकतो. आमचा राजकारण्यांवरही विश्वास नाही.” यासह त्याने अशीही मागणी केली की, “भयानक गुन्हा करणाऱ्या त्या चौघांनाही अटक व्हावी आणि फाशीचीच शिक्षा व्हावी. या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची आम्हाला खात्री आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील व्हायला हवी” दरम्यान, केंद्र सरकारच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेवरही पीडितेच्या कुटुंबीयांनी भाष्य केले असून “अशा प्रकारे मुलींवर सामुहिक अत्याचार करुन त्यांना मारले जात असेल तर मुलींना शिकवायचे कसं?”
या भीषण घटनेनंतर यांपैकी कोणीही आम्हाला दिलासा देण्यासाठी आले नाही. कोणताही राजकारणी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याने माझ्या बहिणीवर चांगले उपचार व्हावेत यासाठी मदत केली नाही. आम्हाला तिच्या वैद्यकीय अहवालही अद्याप मिळालेला नाही. तिच्या उपचारांकडे कोणाचेही लक्ष नव्हते, यात हेळसांड करण्यात आली, असा आरोपही पीडितेच्या भावाने केला आहे.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे गेल्या आठवड्यात एका १९ वर्षीय दलित मुलीवर गावातीलच चार सवर्ण तरुणांनी सामुहिक बलात्कार करुन तिची जीभ छाटली तसेच तिची मानही मोडण्यात आली. त्यानंतर गंभीर अवस्थेत उपचार सुरु असताना मंगळवारी (२९ सप्टेंबर) दिल्लीच्या सफदरगंज येथील रुग्णालयात घटनेच्या सात दिवसांनी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याच रात्री तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देताच परस्पर जाळून टाकला, असा आरोप पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे.
असा घडला प्रकार
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे १४ सप्टेंबर रोजी एका १९ वर्षीय मुलीवर शेतात सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. जखमी मुलीचा दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारदरम्यान मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीला बलात्कारानंतर बेदम मारहाण करण्यात आली होती, इतकेच नव्हे तर तिची जीभ कापून पाठीचे हाड मोडले होते. हाथरसच्या चंदपा भागात आईसह चारा आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर गावातीलच ४ नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, युवतीच्या किंचाळ्यामुळे नराधम पळून गेले.
यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि गंभीर जखमी मुलीला अलीगडच्या मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. मात्र, तिची तब्येत अधिक बिघडल्याने तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले होते. अत्यंत गंभीर स्थितीत असलेल्या या तरुणीची दोन आठवड्यांपासून जीवनमृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज तिची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पोलिसांनी ८ दिवसांनंतर सामूहिक बलात्काराचे कलम एफआयआरमध्ये समाविष्ट केले होते.