देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आता कोरोनाची तिसरी लाट येणार असल्यामुळे तयारी सुरू केली आहे. केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन म्हणाले की, ‘देशात कोरोनाची तिसरी लाट पण येणार आहे. परंतु हे माहित नाही ही लाट केव्हा येईल. आपल्याला यासाठी तयार राहावे लागेल. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट इतकी भीषण आणि मोठी असेल, याचा अंदाज लावला गेला नव्हता.’
बुधवारी पत्रकार परिषदेत के विजय राघवन यांनी सांगितले की, ‘कोरोना व्हायरल मोठ्या प्रमाणात पसरत आहे आणि तिसरी लाट येणे अटळ आहे. परंतु ती कधी येईल हे स्पष्ट झाले नाही. आपल्याला नवीन लाटेसाठी तयार राहिले पाहिजे. दरम्यान व्हायरसचा स्ट्रेन पहिल्या स्ट्रेनप्रमाणे पसरत आहे. यामध्ये नव्या प्रकारच्या संक्रमणाचे गुणधर्म नाही आहे.’
राघवन पुढे म्हणाले की, ‘सध्या कोरोना व्हेरियंट विरोधात लस प्रभावी आहे. देश आणि जगात नवीन व्हेरियंट येतील. दरम्यान कोरोना लाट संपल्यानंतर सावधगिरी कमी केल्याने व्हायरसचा पुन्हा प्रसार होण्याची संधी मिळते.’
‘देशातील १२ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रिय रुग्ण आहे. तर ७ राज्यांमध्ये ५० हजार ते १ लाख सक्रिय रुग्ण असून १७ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी सक्रिय रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात जवळपास दीड लाख सक्रिय रुग्ण आहेत’, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले.
हेही वाचा – Coronavirus: मुंबईकडून नक्कीच शिकण्यासारखं, केजरीवाल सरकारचे सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान