गेल्या दोन आठवड्यांपासून संपूर्ण उत्तर भारताला थंडीच्या तीव्र लाटेने ग्रासले आहे. याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातही वादळी वाऱ्यांमुळे जीवघेणी थंडी पडत होती. पण आता हवामान खात्याने (IMD) नागरिकांना एक दिलासाजनक बातमी दिली आहे. आज रविवारपासून नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, आजपासून धोकादायक थंडीच्या लाटांचा कालावधी संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळणार आहे. पण पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बिहारला अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागणार आहे. कारण हवामान खात्याने (IMD) 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान देशातील काही भागात पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे.
IMD च्या माहितीनुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात येत्या दोन दिवसात तापमान 3-4 अंश सेल्सिअसने वाढू शकते. तर पूर्व भारतातील तापमानात फारसा बदल होणार नाही. मात्र पंजाब, पूर्व राजस्थान आणि येथील काही भागात थंडीची लाट कायम राहील. मात्र येत्या 24 तासानंतर नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये परिस्थिती सुधारेल.
स्कायमेट वेदरच्या अंदाजानुसार, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशासह देशाच्या पूर्व भागाला पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागू शकतो. या भागात 3 फेब्रुवारीपासून हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो, हाच पाऊस पुढे 5 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहू शकतो. इतकेच नाही तर 4 फेब्रुवारीला पश्चिम बंगाल, पूर्व झारखंड आणि उत्तर ओडिशाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडू शकतो. यापूर्वी 9 ते 11 जानेवारी आणि पुन्हा 21 ते 24 जानेवारी दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे पूर्व भारतात अवकाळी पावसाची ही तिसरी फेरी असेल.
काश्मीरमध्ये सध्या कोणताच दिलासा नाही
काश्मीर खोऱ्यात किमान तापमानात सुधारणा झाल्याने थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी हवामान खात्याने सोमवारी काही ठिकाणी पाऊस/बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरमध्ये आदल्या रात्री तापमान उणे ३.६ अंश सेल्सिअसच्या तुलनेत उणे एक अंश सेल्सिअसची नोंद झाली. उत्तर काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या गुलमर्ग येथे उणे ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.