देशात कोरोनाच्या उद्रेकात पाच राज्यांच्या निवडणुका पार पडत आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमध्ये सभा घेणार नसल्याचं जाहीर केलं. राहुल गांधींपाठोपाठ आता भाजपने देखील मोठा निर्णय घेतला आहे. यापुढच्या सभा भाजप ५०० जणांच्या उपस्थित मोकळ्या मैदानात घेणार आहे. पक्षाने अधिकृतरित्या ही घोषणा केली आहे.
कोरोनाचा उद्रेक होत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बंगालमध्ये सभा कशा काय घेतल्या जात आहेत? असा सवाल सर्वच सत्रातून व्यक्त केला जात होता. दरम्यान, राहुल गांधी यांनी सभा न घेण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींपाठोपाठ भाजपने देखील प्रचारसभांबाबत निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे केंद्रीय मंत्री यांच्या सभा आता ५०० जणांच्या उपस्थित घेतल्या जाणार आहेत. शिवाय, बंगालमध्ये ६ कोटी मास्क आणि सॅनिटायझर वाटणार असल्याचं भाजपने घोषित केलं आहे. मात्र, प्रत्यक्षात कशा पद्धतीने या सभा होणार हे पाहावं लागेल.
बंगालमध्ये ८ टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत. त्यांतील ५ टप्प्यातील मतदान पार पडलं. उर्वरित ३ टप्प्यातील मदतान बाकी आहे. २२ एप्रिल, २६ एप्रिल आणि २९ एप्रिल असं तीन टप्प्यातील मतदान बाकी आहे. तर २ मेला निकाल लागणार आहे.