घरदेश-विदेशBengal Assembly Election 2021 : नंदीग्रामच्या निकालाकडे देशाचं लक्ष का? काय आहेत...

Bengal Assembly Election 2021 : नंदीग्रामच्या निकालाकडे देशाचं लक्ष का? काय आहेत तिथली राजकीय गणितं?

Subscribe

कोरोनाच्या संकटात पार पडलेल्या देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज सकाळपासून पाच राज्यांची मतमोजणी सुरु आहे. मात्र, साऱ्या देशाचं लक्ष बंगालमधील नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाच्या निकालाकडे आहेत. बंगालमध्ये २९४ जागांसाठी मतदान झालं. मात्र, या २९४ जागांपैकी केवळ नंदीग्राम मतदार संघाचीच जोरदार चर्चा मतदाना पूर्वी आणि आता मतमोजणी सुरु असताना होत आहे. नंदीग्रामकडे साऱ्यांचं लक्ष का लागलं आहे? याच कारण या मतदारसंघामधून खुद्द पश्चिम बंगाल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली. स्वत:चा पारंपारिक मतदार संघ सोडून त्या नंदीग्राम मतदार संघातून निवडणूक लढल्या. या मतदार संघात नेमकी कोणाची ताकद आहे?

नंदीग्राममध्ये अधिकारींचा दबदबा

नंदीग्राम हा मतदारसंघ पूर्व मिदनापूर जिल्ह्यामध्ये येतो. या जिल्ह्यात ‘अधिकारी’ समुदायाचं वर्चस्व आहे. सुवेंदू अधिकारी, त्यांचे वडील आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री असलेले शिशिर अधिकारी आणि त्यांचे दोन भाऊ या कुटुंबाचं राजकीय वर्चस्व नंदीग्राममध्ये असल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. त्यामुळे नंदीग्राम हा सुवेंदू अधिकारींसाठी सोपा पेपर होता. पण तोपर्यंतच जोपर्यंत त्यांच्यासमोर खुद्द ममता दीदींनीच आव्हान उभं केलं नाही!

- Advertisement -

नंदीग्राममध्ये आत्तापर्यंत हा मतदारसंघ ८ वेळा डाव्या पक्षांच्या ताब्यात राहिला आहे. पण त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांचं सरकार होतं. मात्र, पुढील तीन निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळेच भाजपने या मतदारसंघावर सुरुवातीपासूनच लक्ष केंद्रीत केलं होतं. हा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपने त्यांची जूनी खेळी खेळली. तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपने फोडले. एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे सहकारी आणि तृणमूलचे फायरब्रँड नेते सुवेंदू अधिकारी यांनाच भाजपमध्ये सामिल करुन घेतले. भाजपने ममता दीदींच्या नाकावर टिच्चून सुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राममधून उमेदवारी दिली.

यामुळे ममता दीदींनी कोलकात्यामधला भोवानीपूर हा हक्काचा मतदारसंघ सोडत ममता दीदींनी थेट नंदीग्राम मतदारसंघ निवडला. पक्षातील ज्येष्ठांनी दोन मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला. परंतु दोन मतदारसंघांचा पर्याय नाकारून फक्त नंदीग्राममधूनच उमेदवारी अर्ज भरून सुवेंदू अधिकारी आणि त्यांच्या माध्यमातून आख्ख्या भाजपलाच आव्हान दिलं. ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवत ही लढाई प्रतिष्ठेची केली. दोन्ही बाजूंनी आपली सर्व ताकद पणाला लावली गेली. तीव्र शब्दांत आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. त्यामुळेच नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाची निवडणूक देशभरात हॉट टॉपिक ठरली असून साऱ्या देशाचं नंदीग्राम मतदार संघाच्या निकालाकडे लक्ष लागून आहे.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -