शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात भेट होणार की नाही या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झालेले असतानाच अखेर या भेटीबाबतचा सगळा सस्पेन्स संपुष्टात आला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात शुक्रवारी भेट झाली. ही भेट राजकीय असल्याचे ममता बॅनर्जी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत स्पष्ट केले आहे. लोकशाहीत पुढे जात राहण्याची गरज आहे. आमचे ब्रीदवाक्य हे लोकशाही वाचवा, देश वाचवा असे आहे. आम्ही शेतकऱ्यांनाही पाठिंबा देत आहोत. ममता बॅनर्जी यांनी टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी येथून बाहेर पडताना माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे.
I talked to Sharad Pawar.Visit was successful. We met for political purpose. Democracy must go on. Our slogan is ‘save democracy save country’. We support farmers’ issues too. We’ll come here every 2 months: WB CM Mamata Banerjee after leaving TMC MP Abhishek Banerjee’s residence pic.twitter.com/rQ1h4V5OBy
— ANI (@ANI) July 30, 2021
खुद्द शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी राज्यातील पूरस्थितीच्या निमित्ताने घेतलेल्या पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी यांचा कॉल आला होता असे स्पष्ट केले होते. तसेच ममता बॅनर्जी या भेटीला येणार असल्याचे सांगितले होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट लांबल्याने पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची भेट घेण्याचे टाळल्याचे वृत्तही काही प्रसारमाध्यमांनी दिले होते. अशातच ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातील भेटीचा सस्पेन्स अखेर संपला आहे. ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांच्या भेटीनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ही भेट राजकीय स्वरूपाची होती असे स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी या गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज शुक्रवारी त्यांनी शरद पवारांची भेट घेतली. आज माझे शरद पवार यांच्याशी बोलणे झाले आहे. आता ते मुंबईला जात आहेत, पण आम्ही पुन्हा काही दिवसांनी भेटणार आहे. मी प्रत्येक दोन महिन्यांनी दिल्लीला येणार आहे असेही ममता बॅनर्जी यांनी यावेळी स्पष्ट केले. ममता बॅनर्जी यांनी याआधीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कनिमोळींची भेट घेतली आहे.
ममता बॅनर्जी यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, लोकशाही सध्या धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे देशही धोक्यात आहे. म्हणूनच लोकशाहीत पुढे जात राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.