लोकसभा निवडणुकीच्या तारखा केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्या असून आजपासून संपूर्ण देशात आचार संहिता लागू झाली. पण ही आचार संहिता म्हणजे नेमकी आहे तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना नक्कीच पडत असेल. आचार संहितेचा भंग केल्यानंतर नेमकं होत तरी काय? आणि आचार संहितेचा नेमका भंग तरी कसा होतो? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामन्यांच्या मनात येत असतात. नेमकं हे आचार संहिता प्रकरण आहे तरी काय हे जाणून घेऊया…
१) निवडणुकीची तारीख ठरवण्याचे अधिकार हे निवडणूक आयोगाला असतात. जेव्हा निवडणूक आयोग निवडणुकीची घोषणा करतं, तेव्हापासून आचार संहिता लागू होते.
२) निवडणूक प्रकिया पूर्ण होई पर्यंत आयोगाचे लक्ष आचार संहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्ष तसेच उमेदवारांवर असते. जर एखादा उमेदवार आचारसंहितेचा भंग करताना आढळला, तर त्या उमेदवाराला बाद करण्याचा अधिकार देखील आयोगाला असतात.
हेही वाचा – लोकसभा २०१९ : महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान
३) या काळात उमेदवार किंवा पक्षाला कसलीच आश्वासने देता येत नाहीत, तसेच जातीवाचक भाषण तसेच एखाद्याची व्यक्तिगत बदनामी करता येत नाही. तसेच या काळात लोकांना पैसे वाटले किंवा कसलेही आमिष दाखवले तर तो आचारसंहितेचा भंग होतो आणि त्याच्यावर कारवाई होते.
४) प्रचार रात्री १० पर्यंत करावा असे बंधनकारक असून, परवानगी शिवाय कोणतीही सभा घेण्याचा अधिकार पक्षाला किंवा उमेदवाराला नसतो. रात्री १० ते सकाळी ६पर्यंत लाउड स्पीकर लावता येणार नाहीत. तसेच सभेच्या काही दिवस आधी प्रचाराच्या कार्यक्रमाची वेळ, जागा याची माहिती संबंधित पोलीस स्टेशनला देणे बंधनकारक असते.
५) मतदानाच्या आधी ४८ तास लाऊड स्पीकर लावून प्रचार करता येणार नाही.
६) मंत्र्यांनाही आचार संहिता लागू असते. आचार संहिता लागू झाल्यानंतर मंत्र्यांना कोणतीही विकासात्मक कामांची घोषणा देता येत नाही. तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्याही करता येत नाहीत.