नवी दिल्ली – बंगालच्या उपसागरात उसळलेल्या सीतरंग चक्रीवादळामुळे (Cyclone Sitarang) तब्बल ३५ जणांचा मृत्यू झाला. तसंच, मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. दुसरीकडे भारतात मान्सूनने निरोप घेतला असून आता बंगालच्या उपसागरात (bay of Bengal) तयार झालेल्या सीतरंग चक्रीवादळानेही माघार घेतली आहे. परंतु, चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाल्याने अनेक ठिकाणी पाऊस बरसत आहे. पश्चिम बंगाल, आसाम आणि दक्षिण भारतातही काही भागात हलका ते मध्यम स्वरुपात पाऊस सुरू आहे. त्याचवेळी दिल्ली-एनसीआरमध्ये वाढत्या थंडीमुळे वायू प्रदूषणही वाढू लागले आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये वायू प्रदूषण अत्यंत खराब श्रेणीत आहे आणि यूपी-बिहारचे हवामान कोरडे झाले आहे.
हेही वाचा – बंगालच्या सागरात धडकणार ‘सीतरंग’ चक्रीवादळ; IMD चा ‘या’ राज्यांना इशारा
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, तामिळनाडू, पुड्डुचेरी आणि कराईकलमध्ये २९ आणि ३० ऑक्टोबर रोजी हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी, ३० ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आणि माहेच्या किनारपट्टी भागात पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. ३० ऑक्टोबर रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. इतकेच नाही तर पुढील २ दिवसांत म्हणजे आज २७ आणि २८ ऑक्टोबर दरम्यान आसाम, पश्चिम बंगाल आणि सिक्कीमसारख्या ईशान्येकडील राज्यांमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, पुढील ५ दिवस देशातील उर्वरित भाग कोरडे राहण्याची शक्यता आहे.
स्कायमेटनुसार, पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात आणि लगतच्या भागात चक्रीवादळाचे परिवलन कायम आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि अंदमान निकोबार बेटांवर गेल्या २४ तासांत हलका ते मध्यम पाऊस झाला. एवढेच नाही तर पश्चिम बंगाल, सिक्कीम, तामिळनाडू, केरळ आणि लक्षद्वीपमध्येही पाऊस दिसला. देशातील बहुतांश भागात हवामान कोरडे राहील, परंतु दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आज पाऊस पडू शकतो.
हेही वाचा – बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा अंदाज, ‘या’ राज्यांना धोका
दिल्लीत थंडीसह वायू प्रदूषण
दिल्ली-एनसीआरमध्ये थंडीसोबतच दिवाळीनंतर वायू प्रदूषणातही वाढ होत आहे. राजधानी प्रदेशात अनुकूल वाऱ्यांमुळे बुधवारी सकाळी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सुधारली असली तरी ती अजूनही प्रदूषित आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६ वाजता दिल्लीत हवेचा दर्जा निर्देशांक (AQI) २६२ नोंदवला गेला, जो मंगळवारी दुपारी ४ वाजता नोंदलेल्या AQI (३०३) पेक्षा चांगला आहे. सोमवारी म्हणजेच दिवाळीला दुपारी ४ वाजता दिल्लीचा AQI 312 होता. याशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टी होत आहे.
भारतातून पावसाची माघार
नैऋत्य मान्सूनने रविवारीच संपूर्ण देशाला निरोप दिला. या वर्षी मान्सूनची माघार सामान्य वेळेपेक्षा आठवडाभर उशिराने झाली. IMD म्हणजेच भारतीय हवामान खात्याने सांगितले की, भारतात सलग चौथ्या वर्षी मान्सून सामान्य राहिला. 925 मिमी पावसाची नोंद झाली जी 880 मिमीच्या दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या (LPA) 106 टक्के आहे. सप्टेंबरमधील पावसाने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील पावसाची कमतरता भरून काढली. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीपिके नष्ट झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस साधारणपणे ३० सप्टेंबरपर्यंत असतो. पण यावेळी ३० सप्टेंबरनंतरही पाऊस पडला. IMD च्या आकडेवारीनुसार, मॉन्सूननंतरच्या हंगामात 1 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 104 मिमी पाऊस पडला, जो हंगामातील 63.2 मिमीच्या सामान्य पावसापेक्षा 65 टक्के जास्त होता.