नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपाशी लढण्यासाठी काँग्रेसला कोणत्याही विरोधी पक्षांचा आघाडीचा ‘आधार’ बनावा लागेल. तर, 2029च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्रत्येक राज्यात स्वबळावर लढण्याची तयारी केली पाहिजे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मांडले आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस असलेल्या जयराम रमेश यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसच्या वाटचालीबद्दल आपली भूमिका व्यक्त केली. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा काढण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ते म्हणाले, ‘या वर्षी गुजरातमधील पोरबंदर ते अरुणाचल प्रदेशातील परशुराम कुंडपर्यंत आणखी एक यात्रा काढण्याचा त्यांचा मुद्दा निश्चितपणे मांडणार आहेत. अर्थातच, त्याबाबत अंतिम निर्णय पक्षच घेईल.’
हेही वाचा – TISSने हे असले धंदे बंद करावेत, बीबीसी माहितीपटासंबंधी आमदार आशिष शेलार यांचा इशारा
गुजरात ते अरुणाचल प्रदेश अशा यात्रेचा विचार मी केला असला तरी, पक्षातर्फे अशा यात्रेचे आयोजन केले जाईल की नाही, हे मी सांगू शकत नाही, असे सांगून जयराम रमेश म्हणाले, उदयपूरमध्ये जेव्हा भारत जोडो यात्रेचे नियोजन केले होते, त्यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याचा विचार देखील केला होता.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे मास्टरमाइंड जयराम रमेश आणि दिग्विजय सिंह असल्याचे मानले जाते. 8 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून निघालेल्या भारत जोडो यात्रेचा समारोप 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये होणार आहे. समारोपाच्या कार्यक्रमातील सुरक्षिततेबाबत काँग्रेसने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिले आहे.
@Jairam_Ramesh does the handshake walk. To a very receptive audience #BharatJodoYatra pic.twitter.com/2L2vPiWEkj
— Manish Khanduri (@ManishKhanduri1) January 28, 2023
भाजपा सत्तेत असेल पण अस्तित्वाच्या बाबतीत काँग्रेस ही एकमेव राष्ट्रीय राजकीय शक्ती आहे. आम्ही एकेका राज्यातील सत्ता गमावत असलो तरी, तुम्ही प्रत्येक गावात, पाड्यात, ब्लॉक, तालुक्यात, शहरात पाहिले तर तुम्हाला काँग्रेस कार्यकर्ते, काँग्रेस कुटुंबे सापडतील, ते म्हणाले.