ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढवली आहे. देशाच्या पंतप्रधानांनी ओमिक्रॉन व्हेरिएंच्या पार्श्वभूमीवर शनिवारी तात्काळ बैठक बोलावून देशाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशातील हवाई वाहतूकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्रज्ञांनी देखील ओमिक्रॉनवर भाष्य केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंट भारतासाठी गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळणे महत्त्वाचे आहे. या व्हेरिएंट विरोधात लढायचे असेल ‘तुमच्या खिशातील मास्क’ ही तुमच्यासाठी असेलेली उत्तम लस असेल असे सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
एनडीटिव्हीशी बोलताना, सौम्या स्वामीनाथन यांनी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी योग्य वेळी ‘वेक अप कॉल’ घेणे महत्त्वाचे आहे. नव्या व्हेरिएंटशी लढण्यासाठी नियमित मास्कचा वापर करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे सर्व देशातील नागरिकांचे विशेषत: वयोवृद्ध नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करणे आवश्यक आहे. ज्यांनी कोरोनाची पहिली मात्र घेतली आहे त्यांनी लवकरात लवकर दुसरी मात्र देखील घ्या. कोरोना विरोधी लस तुमचे नव्या व्हेरिएंटपासून रक्षण करेल.
सौम्या स्वामीनाथन यांनी पुढे असे म्हटले की, ओमिक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त संसर्गजन्य आणि धोकादायक असू शकतो. मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. काही दिवसातच ती माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाईल.
ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या गंभीरतेचे स्वरुप अद्याप समोर झालेले नाही त्यावर संशोधन सुरू आहे. मात्र आता असलेल्या परिस्थितीही स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. ज्या देशात लसीकरण झालेले नाही तिथे लसीकरणाला आणखी प्राधान्य द्यावे लागेल आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणा सुरू ठेवावी लागेल. कोविड विरोधाती लढाईत जीनोम सिक्वेन्सिंग खूप महत्त्वाची ठरेल, असे डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – omicron Variant: ओमिक्रॉन व्हेरिएंटला घाबरण्याची गरज नाही – ICMR