राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत हे उत्तराखंडमधील नवे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे भाजपाचा पुढचा चेहरा तीरथ सिंह रावत यांचाच असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. तर उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी धन सिंह रावत, सतपाल महराज, अजय भट, केंद्रीय मंत्री रमेश पोखरियास निशंक आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. मात्र, भाजपने तीरथ सिंह रावत यांची निवड करत चर्चांना पूर्णविराम दिला. पण, तीरथ सिंह रावत आहेत तरी कोण?, असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे.
BJP MP Tirath Singh Rawat to become new chief minister of Uttarakhand, announces Trivendra Singh Rawat who stepped down yesterday pic.twitter.com/DminB0gvRI
— ANI (@ANI) March 10, 2021
तीरथ सिंह रावत यांचा जन्म गढवाल येथील पौडी जिल्ह्यातील सिनो गावात ९ एप्रिल १९६४ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कलामसिंह रावत तर आईचे नाव गौर देवी. तीरथ यांनी सर्व प्रथम उत्तर प्रदेश भारतीय जनता युवा मोर्च्यात प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी उपाध्यक्ष पदाचे कामकाज पाहिले. त्यानंतर १९९७मध्ये ते उत्तर प्रदेशमधील विधानपरिषदेत निवडून आले. नंतर त्यांची विधानपरिषदेच्या अध्यक्षपदासाठीही निवड करण्यात आली आणि ज्यावेळी उत्तराखंडमध्ये भाजपचे पहिले सरकार आले त्यावेळी तीरथ यांना शिक्षणमंत्री बनवण्यात आले.
लो – प्रोफाईल नेता म्हणून ओळख
राजकारणात तीरथ सिंह रावत हे लो – प्रोफाइल नेता म्हणून ओळखले जातात. मात्र, ज्यावेळी विद्यमान मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यावेळी तीरथ सिंह रावत यांचे नाव चांगलेच चर्चेत आले. तीरथ सिंह यांची RSS मध्ये चांगली पकड असून त्यांनी RSS असतानाच भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते भाजप संघटनेचे सचिव बनले. दरम्यान, २००७ साली तीरथ यांची उत्तराखंडाचे महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर २०१२ मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर २०१३ साली त्यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली गेली. तर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत तीरथ हे पौड गढवाल येथून विजयी झाले. त्यांनी तब्बल ३ लाख ५० हजार मतांनी मनीष खंडूरी यांचा पराभव केला.
विशेष म्हणजे तीरथ यांना पक्षापेक्षा संघटनेचे नेते म्हणून मानले जाते. तसेच आगामी काळात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्यावर असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत सर्वांना एकजूटीने ठेवण्याचे काम ते पाहणार आहेत. तीरथ यांना मुख्यमंत्रिपदाबाबत विचारले असता ‘मी आरएसएस प्रचारक होतो आणि त्रिवेंद्र सिंग रावत यांच्या नेतृत्वा खाली मंत्रीही होणार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष यांचा मी आभारी आहे. या दिवसाची मी कधी कल्पनाही केली नव्हती’, असेही ते पुढे म्हणाले.
हेही वाचा – पंतप्रधान पुन्हा चर्चेत, आधी केळं फेकलं आता पत्रकारांवर सॅनिटायझर शिंपडल