युक्रेनमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये भीषण युद्ध सुरु आहे. या युद्धात आत्तापर्यंत शेकडो नागरिकांचा बळी गेला. यामुळे अद्याप हजारो भारतीय विद्यार्थ्यांसह लाखो लोकांनी युक्रेन सोडले. परंतु अद्याप 1500 भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये पडकून पडले आहेत. मात्र अडकलेल्या 1500 भारतीय विद्यार्थ्यांनी मायदेशी परतण्यास नकार दिला आहे. इथेच शिकणार नाहीतर मरणार असं भारतीय विद्यार्थ्यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. यादरम्यान, या परिस्थितीत मृत्यू झाला आणि शवपेटीतून न्यावे लागले तरी त्यांना ते मान्यता आहे. याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. असही ते म्हणाले.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, भारत सरकारने त्यांच्यापुढे कोणताही पर्याय सोडलेला नाही. यातील काही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यातील अभ्यासाबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे. यावर 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थीही याची वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विद्यार्थी भारत सरकारचा सल्ला मानण्यास तयार नाहीत. सरकारने या विद्यार्थ्यांना तातडीने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला आहे. तरीही युक्रेनला गेलेल्या 1500 हून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतायचे नाही. त्यांचे म्हणणे आहे की, त्यांना युक्रेनमध्ये राहून आपलं शिक्षण पूर्ण करायचे आहे. यादरम्यान जर मृत्यृ झाला तर शवपेटीतून येण्यासही ते तयार आहेत.
यातील एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्हाला खूप अडचणी येत आहेत, मात्र आम्ही आमचा अभ्यास पूर्ण करूनच घरी येऊ. त्यांना युक्रेनमध्ये राहण्याशिवाय पर्याय नाही, कारण भारत सरकारने त्यांना आधीच भारतीय वैद्यकीय संस्थांमध्ये प्रवेश देण्यास आधीच नकार दिला आहे. यामुळे मायदेशी परतलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.
नॅशनल मेडिकल कमिशन, जे भारतातील वैद्यकीय शिक्षणावर देखरेख करते, त्यांचे मत आहे की, ते ऑनलाइन क्लासेसद्वारे प्राप्त केलेल्या पदवींना परवानगी देणार नाही. त्यामुळे युक्रेनमध्ये शिक्षण घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्याचे या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.