आज कोलकाताच्या शहीद मैदानात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनात जाहीसभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा, काश्मीर, श्यामा प्रसाद मुखर्जी आणि राम मंदिराच्या मुद्यावरुन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची तोफ डागली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तृणमुल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी विरोध करत आहेत. परंतू आम्ही नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन मागे हटणार नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह राज्यात सत्ता स्थापन करेल, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममतांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा घेतली. याआधी ममता बॅनर्जींनी विरोधी पक्षात बसून शरणार्थींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्या काँग्रेस आणि डाव्या पक्षांना घेऊन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायदा नागरिकत्व काढून घेत नाही तर नागरिकत्व देते. परंतू ममता बॅनर्जी अल्पसंख्यांकांमध्ये या कायद्याविषयी भिती निर्माण करत आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे अल्पसंख्यांकावर कसलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे अल्पसंख्यांकांनी या कायद्याला घाबरुन जाऊ नये, असे अमित शाह म्हणाले.
हेही वाचा – हृतिक रोशन करणार हॉलिवूडमध्ये पदार्पण
दरम्यान, मागील विधानसभा निवडणुकांच्या वेळी ममता बॅनर्जी यांनी अमित शाहांना हेलीकॉप्टर उतरवण्याला परवानगी दिली नव्हती. यावरुन अमित शाहांनी ममता बॅनर्जींचा समाचार घेतला. ममता बॅनर्जींनी मागील विधानसभा निवडणुकीवेळी आम्हाला प्रचार करताना अनेक अडथळे निर्माण केले. आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार केला. आमच्या ४० हून अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. मात्र, ममता बॅनर्जी आम्हाला रोखू शकल्या नाहीत, असे अमित शाह म्हणाले. यावेळी ‘आर नॉई अन्याय’ असा नारा देण्यात आला. आर नॉई अन्याय म्हणजे अजून अन्याय सहन करणार नाही. दरम्यान, हा नारा पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन घडवून आणेल, असा विश्वास अमित शाहा यांनी केला आहे.
हेही वाचा – भाजप मंत्र्याच्या मुलीचा लग्न खर्च ५०० कोटी?