देशात सातत्याने पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ होतेय. या वाढत्या किंमतींवर आता भाजपच्या योगी सरकारमधील पशुधन आणि दूध विकास मंत्री धरमपाल सिंह यांनी एक अजब विधान केलं आहे. या विधानामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. धरमपाल सिंह म्हणाले की, “शेणापासून सीएनजी बनवणे हे आमचे प्राधान्य आहे. गरज पडल्यास म्हशीचे शेणही खरेदी करु. सीएनजी बनवणाऱ्या कंपनीशी चर्चा झाली असून, शेण खत दीड रुपये किलोने विकत घेण्याची ऑफर दिली आहे, मात्र आम्ही दोन रुपये किलो दर देण्याचे सांगितले आहे. कंपनीचे लोक विचार करत आहेत. त्यांनीही शेणापासून सीएनजी बनवून सरकारला डेमो दाखवला आहे. सुरुवातीला मॉडेल म्हणून बरेली मंडळाची निवड करण्यात आली आहे.”
बांदा दौऱ्यावर आलेले कॅबिनेट मंत्री धरमपाल सिंह पुढे म्हणाले की, “सरकारला समाजाच्या मदतीने राज्यातील गोशाळा आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवायच्या आहेत. मात्र शेणखत खरेदीच्या विधानावरून त्यांना सोशल मीडियावर आता जोरदार ट्रोल केलं जात आहे. यावर उत्तर देताना मंत्री म्हणाले की, “चांगला विषय मांडला आहे. मी हे विसरलो होतो, बघा, जोपर्यंत गोशाळांची आर्थिक स्थिती सुधारत नाही तोपर्यंत काही होणार नाही, एका कंपनीशी बोललो. ट्रोलिंगचा विषय सोडा, आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय.”
“आत्ता आम्ही बरेली विभागाला मॉडेलच्या रुपात एक गॅस बनवणारी कंपनी दिली आहे. नंतर झाशी, गोरखपूर, चित्रकूट आणि इतर विभागात काम करतील. या विभागामध्ये शेणापासून सीएनजी बनवावा लागतो. समाजाच्या मदतीने बांद्याच्या गोशाळांना आर्थिकदृष्ट्या संपन्न बनवायचे आहे.” असं देखील मंत्री धरमपाल सिंह म्हणाले.