Homeसंपादकीयअग्रलेखBhaskar Tambe : लोकप्रिय कवी भा. रा. तांबे

Bhaskar Tambe : लोकप्रिय कवी भा. रा. तांबे

Subscribe

भास्कर रामचंद्र तांबे हे प्रसिद्ध कवी होते. त्यांचा जन्म २७ ऑक्टोबर १८७३ रोजी मध्य भारतातील मुगावली येथे झाला. त्यांचे शिक्षण झांशी आणि देवास येथे झाले. ते १८९३ मध्ये प्रवेशपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले, परंतु आर्थिक प्रतिकूलतेमुळे त्यांना उच्च शिक्षण घेता आले नाही. मध्य भारतातच वेगवेगळ्या ठिकाणी युवराजशिक्षक, दिवाण, पोलीस-सुपरिंटेंडंट, सरकारी वकील, न्यायाधीश, शिक्षणखात्यात परीक्षा विभागाचे रजिस्ट्रार इत्यादी नोकर्‍यांमध्ये जीवन व्यतीत झाले. ते १९३७ मध्ये ग्वाल्हेर संस्थानाचे राजकवी झाले.

काव्यास विशेष अनुकूल नसणार्‍या व्यवसायातही तांबे यांचा काव्यलेखनाचा छंद कायम राहिला. इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायाचे कवी, टेनिसन-ब्राउनिंग, जयदेव हे संस्कृत कवी तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचे संस्कार त्यांच्यावर वेळोवेळी होत गेले. परंतु त्यांच्या कवितेचे मुख्य स्वरूप गीतांचे, भावगीतांचे राहिले.

- Advertisement -

ब्राउनिंगच्या नाट्यात्मक एकभाषितांप्रमाणे त्यांनी मराठीमध्ये प्राचुर्याने नाट्यगीते लिहिली. त्यांची कविता प्रथम संग्रहरूपाने १९२० मध्ये रसिकांपुढे आली, नंतर दुसरा भाग १९२७ साली आणि समग्र कविता १९३५ साली प्रकाशित झाली. त्यामध्ये एकूण २२५ कविता आहेत. काही हिंदी कवितांचाही त्यात अंतर्भाव आहे.

त्यांच्या ‘अजुनि लागलेचि दार’, ‘कशी काळ नागिणी’, ‘कळा ज्या लागल्या जीवा’, ‘कुणि कोडे माझे उकलिल का’, ‘घट तिचा रिकामा’, ‘घन तमीं शुक्र बघ’, ‘चरणि तुझिया मज देई’, ‘जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘डोळे हे जुलमि गडे, तिनी सांजा सखे मिळाल्या’, ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, इत्यादी कविता प्रसिद्ध आहेत. अशा या लोकप्रिय कवीचे ७ डिसेंबर १९४१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -