राजकारणात वाचाळवीरांची कमतरता नसते. कुठे काय आणि किती बोलावे, याचे भान नसलेली ही मंडळी अनेकदा आपल्या नेत्यांना अडचणीची ठरत असतात. ‘सोडलं तर पळतंय अन् धरलं तर चावतंय’, अशी अवस्था नेत्यांची होते. त्यामुळे या वाचाळवीरांना आवरणे फार कठीण होऊन बसते. ठाण्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कथित आरोपावरून जे काही राजकीय रणकंदन माजले ते पाहिल्यानंतर महाराष्ट्रापुढील सर्व प्रश्न संपलेत असे वाटत आहे. कारण लोकांचे प्रश्न सोडविण्यापेक्षा एकामेकांविषयी वादग्रस्त विधाने करून लोकांचे लक्ष आपल्याकडे खेचून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा या नेत्यांचा कल दिसत आहे. सत्ताधारी नेत्यांकडून जी शेरेबाजी चालली आहे, ती शोभा देणारी नाही. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारमधील काही मंत्र्यांनी वक्तव्ये केली ती धक्कादायक आहेत. त्यावरून इतके वर्षे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वावरूनही या नेत्यांकडे परिपक्वता आली नाही, असेच दिसते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येणार हे निश्चित झाल्यानंतर शिंदे गटासह भाजपचेही काही आमदार सुसाट सुटल्यासारखे बेताल वक्तव्ये करताना सर्वांनी पाहिले. आपण काय बोलतोय याचे भान नसल्याने शिंदे आणि फडणवीस यांच्यावर त्यांना आवरण्याची वेळ वारंवार आली आहे. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये सत्तेत आलेल्या मोरारजी देसाई मंत्रिमंडळात उत्तर प्रदेशचे खासदार राजनारायण आरोग्य मंत्री होते तेव्हाची त्यांची बेताल वक्तव्ये अनेकांच्या आजही स्मरणात असतील. अनेकदा त्यांच्या नेत्यांना राजनारायण डोकेदुखी ठरले होते. महाराष्ट्रात माजी मुख्यमंत्री बॅ. बाबासाहेब भोसले यांची वक्तव्येही त्या काळी खळबळजनक ठरली होती. थोडक्यात काय तर भन्नाट वक्तव्य करून नेत्यांची डोकेदुखी वाढविणार्या वाचाळवीरांची ‘परंपरा’ खंडित झालेली नाही. मात्र राजकीय परिस्थिती बदलत गेल्याने वाचाळवीरांच्या संख्येत वाढ झाल्याचे मान्य करावे लागेल. नेत्यांना वारंवार आपल्या सहकारी वाचाळवीरांना आवरण्याची वेळ येत असेल तर ते नक्कीच बरे नव्हे!
महाराष्ट्रात सत्तापालट होण्यापूर्वी आणि त्यानंतर अनेकांची जीभ वारंवार घसरत असल्याचे दिसून येते. आपल्या आमदारांना आणि मंत्र्यांना ‘कमी बोला’ असे सांगण्याची वेळ मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अधूनमधून येत आहे. मुख्यमंत्र्यांनी एकदा भर बैठकीतच वाचाळवीरांना झापले होते. आपण काय बोलतोय किंवा आपल्या वक्तव्याने पक्ष, नेते अडचणीत येतील याचे भान या वाचाळवीरांना नसावे, असे म्हणणे काहीसे धाडसाचे ठरेल. काँग्रेस, शिवसेना आणि शिंदे गट असा प्रवास केलेले गांधी टोपीधारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचा विद्यमान वाचाळवीरांमध्ये काहीसा वरचा क्रमांक आहे. मध्यंतरी तर त्यांनी एका बैठकीत एका वरिष्ठ अधिकार्याला ‘दारू पिता का’ असा थेट सवाल करून स्वतःच्या अकलेचे दिवाळे वाजवले होते.
सत्तार यांची अनेक वक्तव्ये त्यांच्या थिल्लर राजकीय कारकिर्दीला शोभादायक अशीच आहेत. पंतप्रधान कृषी सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातही योजना आणणार असल्याचे वक्तव्य करून या महाशयांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. यावरून शिंदे यांनी त्यांना योग्य ती समज दिली होती. दुसरे एक मंत्री तानाजी सावंत यांनीही बेफाम वक्तव्ये करून नेत्यांची बेचैनी वाढवली होती. मराठा आरक्षणावर त्यांनी केलेल्या वक्तव्याने इतका गहजब झाला की त्यांना अखेर मराठा समाजाची जाहीर माफी मागावी लागली. सत्तेत येण्यापूर्वी प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांची वक्तव्येही शिंदे गटाला अडचणीची ठरली होती. मध्यंतरी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी तर शिवसेनेतील कार्यकर्त्यांचे हात-पाय तोडण्याची भाषा केली होती.
आणखी एक आमदार संतोष बांगर यांनीही अशी काही विधाने केली की शिंदे यांच्यावर कपाळाला हात लावण्याची वेळ आली असेल. काही दिवसांपूर्वी रवी राणा आणि प्रहारचे बच्चू कडू यांच्यात रंगलेल्या सामन्यात आरोप-प्रत्यारोप, धमक्यांची राळ उडाली ती पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, असे म्हणण्याची वेळ जनतेवर आली. काही तरी बेताल बोलायचे आणि आपल्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेण्याची खोड अनेक नेत्यांना असते. आपल्या बोलण्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यास हातभार तर लागणार नाही ना, याचा विचार ही मंडळी अजिबात करत नाहीत. असे काही प्रसंग घडलेले आहेत की यापूर्वी बेताल नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेला आहे. आता तसे होणार नाही. कारण सत्तेची मोट बांधताना सोबत घेतलेल्यांपैकी काहीजण ताळतंत्र सोडून बोलत असले तरी त्यांना ‘सांभाळून’ घ्यावे लागते. यात खरं तर बेतालपणाला अधिक प्रोत्साहान मिळते हे सांगायला नको.
भाजपचे आमदार राम कदम यांच्यासारख्यांनीही आपल्या पक्षाला अडचणीत आणण्याचे काम अनेकदा चोखपणे पार पाडलेले आहे. दोन वर्षांपूर्वी घाटकोपरमधील दहीहंडी उत्सवात त्यांनी केलेले विधान त्यांच्या इतके अंगलट आले की काही दिवस त्यांच्यावर राजकीय विजनवासासारखी परिस्थिती ओढावली होती. किरीट सोमय्या यांची वक्तव्येही नेत्यांना बेदखल करावी लागली आहेत. राजकारणात असताना काही परंपरा, आदर्श पाळायचे असतात याचे भान वाचाळ नेत्यांना राहत नाही की नेत्यांचीच त्यांना फूस असते, असा सवालही उपस्थित होतो. जनतेने आपल्याला त्यांचे प्रतिनिधी म्हणून निवडले याची जाणीव काहींना नसते. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हेही अनेकदा भन्नाट वक्तव्यांमुळे विरोधकांच्या रोषाचे धनी ठरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बोलताना संयम ठेवा, प्रसारमाध्यमांना आयते खाद्य पुरवू नका असे सांगून आपल्या पक्षातील खासदार आणि नेत्यांचे कान टोचले होते.
अर्थात सर्वच पक्षाच्या नेत्यांवर वाचाळवीरांना आवरण्याची वेळ आलेली आहे. देशाच्या राजकारणात सुब्रमण्यम स्वामी, राम जेठमलानी यांची वक्तव्येही खळबळ उडवून देणारी ठरली आहेत. काँग्रेसमध्येही वाचाळवीरांची कमतरता राहिलेली नाही. फक्त आता या वाचाळवीरांचे उदंड पीक आल्यासारखी परिस्थिती आहे. शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री, आमदारांच्या वाचाळपणावरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच भडकले आहेत. त्यांनी या वाचाळवीरांना आवरण्याची मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे जाहीररित्या केली आहे. अनेकदा भान सोडून केलेले वक्तव्य मीडियासाठी खाद्य पुरविणारे ठरत असले तरी त्यातून समाजात चुकीचा संदेश जाण्याची अधिक शक्यता असते. एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दिन ओवेसी, सपाचे अबू आझमी यांच्या बेताल वक्तव्यांनी अनेकदा खळबळ उडवून दिली आहे. धर्माचे राजकारण करत असताना त्या-त्या पक्षाच्या, संघटनांच्या संबंधित नेत्यांनी केलेली बेताल वक्तव्ये समाजकारण ढवळून काढणारी ठरली आहेत. वाचाळवीरांच्या आलेल्या उदंड पिकाला खतपाणी न घालणेच उचित ठरणार आहे.