घरसंपादकीयदिन विशेषकृषितज्ज्ञ, मुख्यमंत्री वसंतराव नाईक

कृषितज्ज्ञ, मुख्यमंत्री वसंतराव नाईक

Subscribe

वसंतराव फुलसिंग नाईक हे महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व एक कृषितज्ज्ञ होते. त्यांचा जन्म १ जुलै १९१३ रोजी विदर्भातील गहुली (जिल्हा यवतमाळ) येथे सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण विविध खेड्यांत झाले. पुढे त्यांनी विठोली व अमरावती येथे माध्यमिक शिक्षण घेऊन नागपूरच्या मॉरिस कॉलेजमधून बी.ए. ही पदवी घेतली (१९३८) व नंतर एल्एल.बी ही पदवीही मिळविली (१९४०).

त्यांनी कायद्याची पदवी घेऊन पुसद येथे वकिलीस सुरुवात केली. नंतर ते पुसद कृषिमंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (१९४३-४७). १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पहिल्या निवडणुकीत ते मध्य प्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले (१९५२-५६). १९५६ मध्ये राज्यपुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबई द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री झाले (१९५७). पुढे १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूलमंत्री होते. १९६२ च्या निवडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूलमंत्री होते; पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले (१९६३). या पदावर त्यांनी सु. १२ वर्षे काम केले. या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.

- Advertisement -

प्रथमतः त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल याकडे लक्ष दिले. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५ मध्ये निक्षून सांगितले; त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन व्यावहारिक असे. कोणतीही समस्या ते विचारविनिमय करून तडजोडीच्या धोरणाने सोडवीत. त्यांनी शिक्षण, शेती वगैरे बाबतींत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या. विशेषतः पाझर तलाव व वसंत बंधारा यांच्या निर्मितीचे श्रेय त्यांच्याकडे जाते. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळानंतर वसंतरावांनी आपल्या जिल्ह्यातच सामाजिक कार्य केले. अशा या कर्तृत्ववान नेत्याचे १८ ऑगस्ट १९७९ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -