शंकर सारडा हे साहित्यिक आणि समीक्षक होते. त्यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर याठिकाणी झाला. दीर्घकाळ साहित्याच्या, समीक्षेच्या क्षेत्रात घालवल्यावर व पत्रकारिता केल्यावरही त्यांचा ‘स्नेहशील’ या शब्दाने गौरव होत असे. लेखक म्हणून त्यांनी १९५० पासून सातत्याने बालसाहित्य लिहिले. पत्रकारितेत राहून साहित्याच्या जगात विहार करणारे अनेक ज्येष्ठ पत्रकार आहेत.
ही परंपरा अगदी कृष्णाजी प्रभाकर खाडिलकरांपासून सुरू होते आणि ती अखंडितच आहे. शंकर सारडा हे या परंपरेतील एक लक्षात राहणारे व्यक्तिमत्त्व. दैनिकाच्या धबडग्यात बातमीदारी किंवा बातम्यांची भाषांतरे करणे, याहून जरा निराळे पण आवडीचे असे पुरवणी संपादनाचे काम त्यांना मिळाले आणि त्यामुळेच त्यांना त्यांचा व्यासंगही करता आला. वृत्तपत्रीय स्तंभांमध्ये येणारी पुस्तक परीक्षणे ही परिचयात्मक न राहता, त्यामध्ये अधिक सखोलता यायला हवी, असा सारडा यांचा हट्ट असे.
त्यांनी लिहिलेली परीक्षणे याची साक्ष आहेत. त्या लेखनामुळे साहित्य वर्तुळात त्यांचा दबदबा तर निर्माण झालाच, परंतु स्वत:च्या लेखनाकडेही त्यांना समीक्षकाच्या नजरेतून पाहता आले. लहानपणापासून असलेली वाचनाची आवड जशी त्यांच्या उपयोगाला आली, तशीच लेखनाची पारखही करता आली. ज्या काळात मराठी साहित्यामध्ये आधुनिकतेचा प्रवाह क्षीण स्वरूपात का होईना सुरू झाला, तेव्हा शंकर सारडा यांनी त्या प्रवाहाला उजळ केले आणि ‘वासूनाका’, ‘चक्र’ यांसारख्या कादंबर्यांचे महत्त्व वाचकांसाठी अधोरेखित केले. टॉलस्टॉय, गीबन यांच्या कादंबर्यांचा अनुवाद आणि ‘सोन्याच्या टेकडीचा शोध’, ‘जादूमंतर छ’ू, ‘शर्थ पराक्रमाची’ यांसारख्या बालसाहित्यात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. अशा या श्रेष्ठ साहित्यिकाचे २८ जानेवारी २०२१ रोजी निधन झाले.