घरसंपादकीयदिन विशेषविनोदी लेखक बाळ गाडगीळ

विनोदी लेखक बाळ गाडगीळ

Subscribe

पांडुरंग लक्ष्मण उर्फ बाळ गाडगीळ हे पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, सिंबायोसिस संस्थेचे उपाध्यक्ष तसेच विनोदी लेखक होते. विनोदी साहित्याबरोबरच त्यांनी अर्थशास्त्रीय लिखाण, तसेच अनुवादही केले होते. त्यांचा जन्म 29 मार्च 1926 रोजी रत्नागिरीतील अणसुरे याठिकाणी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात नूतन मराठी विद्यालयात, तर पुढील शिक्षण मुंबई येथे झाले. मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातून ते अर्थशास्त्र विषयात एमए झाले. त्यांनी नंतर अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठामधून अर्थशास्त्रात एमएस केले.

त्यांनी भारत सरकारच्या प्राप्तिकर खात्यात काही काळ नोकरी केली, मात्र त्यांचा खरा ओढा अध्यापनाकडे होता. ते सुरुवातीला फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. नंतर उपप्राचार्य, तर पुढे ११ वर्षे ते प्राचार्य होते. पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणूनही त्यांनी एक वर्ष काम पाहिले. त्यानंतर ते पुण्यातीलच सिंबायोसिस संस्थेशी जोडले गेले. सुरुवातीला सल्लागार म्हणून, तर नंतर काही काळ संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून ते काम करीत होते.

- Advertisement -

त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ‘लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ‘एकच प्याला, पण कोण?’, ‘अखेर पडदा पडला’, ‘फिरकी’, ‘वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली. ‘सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. याखेरीज दोन विनोदी कादंबर्‍या, व्यक्तिचित्रे, टीकाग्रंथ, भाषांतर तसेच बालवाङ्मय हे प्रकारही त्यांनी हाताळले.‘वळचणीचं पाणी’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. अशा या प्रतिभावान विनोदी लेखकाचे २१ मार्च २०१० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -