गजानन यशवंत माणिकराव हे आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे प्रवर्तक व मल्ल होते. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1878 रोजी बडोदे येथे झाला. उस्ताद जुम्मादादा यांनी त्यांना मल्लविद्येचे धडे दिले. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी 3000 दंड, 5000 बैठका व 7 तास कुस्तीची मेहनत ते करीत असत.
अस्थिसंधान, शस्त्रास्त्रविद्या व युनानी वैद्यक यांतही त्यांनी प्रावीण्य संपादन केले. त्यांनी महाराष्ट्र व गुजरातमध्ये गावोगावी व्यायामशाळा स्थापन केल्या. लाठी, लेझीम, फरीगदगा, जोडी, लकडी, बनेटी इ. अनेक देशी खेळ व व्यायामप्रकार यांना विविध पवित्रे देऊन, त्यांचे शास्त्र निर्माण करून, त्यांना सांघिक व्यायामाचे स्वरुप प्राप्त करून दिले. त्यांनी बडोदे येथे ‘कन्या आरोग्य मंदिरा’ची स्थापना केली व मुलींना व्यायामशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.
सैनिकी संचलने व कवायती यांच्यासाठी इंग्रजी आज्ञांऐवजी त्यांनी आज्ञाशब्द तयार केले. बडोद्यातील 1918 सालच्या फ्ल्यूच्या साथीत व 1927 च्या महापुराच्या वेळी त्यांनी भरीव समाजकार्य केले. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी क्रांतिकारकांना व्यायाम मंदिरात गुप्त आश्रय दिला, त्यांना शस्त्रविद्येचे धडेही दिले. त्यांनी बडोद्यात सार्वजनिक गणेशोत्सव व शिवाजी उत्सव सुरू केले.
त्यांच्या समाजकार्याच्या गौरवार्थ बडोदे सरकारकडून त्यांना ‘राजरत्न’ व ‘राजप्रिय’ या पदव्या बहाल करण्यात आल्या. ते आजन्म ब्रह्मचारी होते. भारतीय व्यायामविद्येचे ‘भीष्माचार्य’ म्हणूनही त्यांना गौरवाने संबोधण्यात येते. बडोद्याच्या लक्ष्मीविलास राजवाड्यात त्यांनी भव्य शस्त्रसंग्रहालय उभारले व त्याचा परिचय करून देणारा प्रताप शस्त्रागार हा ग्रंथही लिहिला. भारतीय व्यायाम (1941) हे त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध आहे. बडोदे येथे त्यांचे 25 मे 1954 रोजी निधन झाले.