संजीवनी मराठे यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९१६ रोजी पुण्यात झाला. त्यांनी शालेय जीवनापासूनच काव्यलेखन व काव्य गायनास सुरुवात केली. त्यांनी एमएची पदवी मिळवली होती. कशी अचानक जनी प्रकटते मनातली उर्वशी, मी न कुणाला सांगायची कविता स्फुरते कशी, असे म्हणणार्या संजीवनी यांनी शेकडो उत्तमोत्तम कविता लिहून मराठी काव्यक्षेत्रात आपले नाव दीर्घकाळ चमकत ठेवले.
आपल्या भावमधुर काव्य गायनामुळे त्या रसिकांना परिचित झाल्या. त्यांनीच गायलेली त्यांची गीते खूप गाजली. प्रासादिक शैली व नादपूर्ण रचना यामुळे १९३२ (काव्य संजीवनी) ते १९९४ (आत्मीय) या कालखंडात त्यांनी कवितेच्या प्रांतात आपला ठसा उमटवला.
काव्य संजीवनी (१९३२), राका (१९३९), संसार (१९४३), चित्रा (१९५७), छाया (१९४९), भावपुष्प, परिमला हे त्यांचे काव्यसंग्रह खूपच गाजले. ‘गंमत’ आणि ‘बरं का गं आई’ हे बालगीतांचे संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कवी कुसुमाग्रज व जोग यांनी संपादित केलेल्या ‘काव्यवाहिनी’च्या चौथ्या खंडात संजीवनी मराठे यांच्या चार कविता समाविष्ट आहेत. पुण्याच्या ‘अनाथ विद्यार्थी गृह’ प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ‘मराठी साहित्य दर्शन’च्या दहाव्या खंडात त्यांच्या काव्याचा परिचय करून देण्यात आला आहे.
कवितांखेरीज ‘ट्युलिप्सच्या देशातून’ (१९९३) व ‘गीतांजली दर्शन’ (१९९८) ही त्यांची अनुक्रमे पत्रसंकलन व काव्यानुवाद असलेली पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्र शासनाने बरं का गं आई आणि हसू बाई हसू या त्यांच्या संग्रहांना प्रथम पुरस्कार देऊन त्यांचा उचित गौरव केला. संजीवनी मराठे यांचे १ एप्रिल २००० रोजी निधन झाले.